टीम लय भारी
मुंबई : कोविडचा कहर सुरु असताना राज्याचा टेंन्शन पुन्हा वाढला आहे. राज्यात आठवडाभर पुरेल एवढाच रक्ताचा साठा असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली. रक्तदानासाठी पुढाकार घेण्याचं आवाहन सरकारने रक्तदात्यांना केलं आहे.
मुंबईसह राज्यात दररोज कोविडचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे सरकार आणि प्रशासनासमोरील चिंता वाढली आहे. त्यामध्ये पुन्हा राज्यात आठवडाभर पुरेल एवढाच रक्तसाठा असल्यामुळे चिंतेमध्ये भर पडली आहे. फक्त कोविड रुग्णांवरील उपचारासाठीच नाही, तर विविध शस्त्रक्रिया, बाळंतपण किंवा कर्करोग, थॅलसेमिया अशा आजारांमध्ये रक्ताची निकड असते. त्यामुळे सोसायट्या, सामाजिक संस्था यांनीही रक्तदान शिबिरं घ्यावी, असं आवाहन राजेंद्र शिंगणे यांनी केलं.
‘कोरोना’ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रक्त पुरवठा, पीपीई किट्स, मास्क यांची उपलब्धता जाणून घेण्यासाठी ब्लड बॅंक आणि पीपीई किट्स-मास्क उत्पादक यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर शिंगणे बोलत होते.
कोरोनाग्रस्तांना उपचाराचा भाग म्हणून रक्ताची आवश्यकता नसली, तरी त्याला अॅनिमिया किंवा तत्सम आजार असल्यास रक्ताची आवश्यकता भासू शकते. जवळची ब्लड बॅंक, रुग्णालय किंवा सोसायटीमध्ये रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन, संपूर्ण सुरक्षितता बाळगून छोटेखानी ब्लड कॅम्प घेण्याचा सल्ला मंत्र्यांनी दिला. त्यामुळे विविध सामाजिक संघटना, एनजीओंनी रक्तदान करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.