वाढत्या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी विद्यार्थी जीवतोड मेहनत घेत असतात. पण अनेकदा ते त्यात यशस्वी होतातच असे नाही. अशावेळी अनेक विद्यार्थी आत्महत्येचा मार्ग चोखाळत असतात. जळगाव जिल्ह्यातील गणेश कॉलनीमध्ये मंगळवारी रात्री 11.15 वाजता अशीच घटना घडली असून ‘मला अभ्यासाचा लोड झेपत नाही, त्यामुळे मरायला जातो आहे,’ अशी सुसाईड नोट लिहून एका दहावीच्या विद्यार्थ्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. तन्मय गजेंद्र पाटील (वय- 14, रा. गणेश कॉलनी, जळगाव) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.
जळगावातील ए. टी. झांबरे विद्यालयात दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असेला तन्मय हा गणेश कॉलनीत वडील ॲड. गजेंद्र पाटील, आई व मोठ्या भावासह वास्तव्यास होता. मंगळवारी रात्री त्याने कुटुंबासोबत जेवण केले आणि त्यानंतर सर्व जण झोपले. त्यानंतर रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास कुटुंबिय गाढ झोपेत असतानाच ओढणीच्या सहाय्याने छताच्या कडीला गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली.
तन्मयचे वडीलांना रात्री अचानक जाग आल्यानंतर त्यांना तन्मय जागेवर दिसला नाही. त्यांनी वरच्या खोलीत जाऊन बघितले असता त्यांना तन्मयने गळफास घेतल्याचे दिसून आले. मुलाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसताच त्यांनी आक्रोश केला. त्यानंतर मुलाला लागलीच जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयमध्ये दाखल करण्यात आले. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. तन्मयच्या पश्चात आई, वडील आणि मोठा भाऊ असा परिवार आहे.
अभ्यासाचा लोड मला झेपत नाही
आत्महत्या करण्यापूर्वी तन्मयने आपल्या वहीच्या पानावर सूसाईट नोट लिहून ठेवली होती. ‘मी मरायला जातो आहे. कारण अभ्यासाचा लोड मला झेपत नाहीये. मी गेल्यावर तरी शांती होईल, चिडचिड होणार नाही. मला नाशिकला जायचे होते. पण आता, अभ्यासाचा लोड इतका होता की, शेवटी मला मरुन जावे लागले. त्यामुळे माझा शेवटचा जय गजानन…! ‘ पोलिसांनी ती सूसाईट नोट जप्त केली आहे.
याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अभ्यासाच्या तणावातून दहावीच्या विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तन्मय हा शाळेत नेहमी हजर राहत होता. तो अत्यंत शांत व संयमी स्वभावाचा असल्याचे त्याच्या शाळेतील शिक्षकांनी सांगितले.
विद्यार्थी आत्महत्या चिंतेचा विषय
विद्यार्थ्यांच्या वाढणाऱ्या आत्महत्या ही अगदी महाविद्यालयांसाठीही चिंतेची बाब ठरली आहे. मात्र, काही अपवाद वगळता अजूनही बहुतेक महाविद्यालयांमध्ये अजूनही समुपदेशनाची सुविधा नाही. अभ्यास, स्पर्धा, नातेसंबंधांमधील तणाव अशा अनेक कारणांमुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांकडून नोंदवले जात आहे.