मागच्या काही दिवसांपासून कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. कांदा शेतीतून लागवाडीचा खर्च सुद्धा निघत नाहीये. अशावेळी प्रशासनाकडून आशेची कास लावून बसलेल्या शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र अशा कठीण समयी सोलापूरच्या एका शेतकऱ्याला मात्र वेगळ्याच प्रसंगाला सामोरे जावे लागले. (Onions: 2 Rupees Check to solapur Farmer!)
सोलापुरातील बाजार समितीत राजेंद्र तुकाराम चव्हाण या शेतकऱ्याने १० पोते म्हणजे जवळपास ५१२ किलो कांदे विकण्यास आणले होते. लिलाव झाला अन् भाव मिळाला. पट्टी तयार करण्यासाठी आडत व्यापऱ्याने पावती पुस्तक काढले अन् हमाली ४०.४५ रूपये, तोलाई २४.०६ रूपये, मोटारभाडे १५, रोख उचल ४३०, कांद्याचे झाले ५१२ रूपये. या शेतकऱ्याचा खर्च वजा होता १० पोते कांदे विकल्यावर फक्त २ रूपये ४९ पैसे पट्टी मिळाली. दरम्यान चेकवर तारीख देखील ८ मार्च २०२३ दिल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या पट्टीची चिठ्ठी अन् आडत्याने शेतकऱ्याला दिलेला चेक सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाले असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी देखील यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
राजू शेट्टी यांनी लिहिलंय, राज्यकर्त्यांनो जरा तरी लाज बाळगा. शेतकऱ्यांनी जगायचं कसं हे तुम्हीच सांगा. एका बाजूला थकबाकी पोटी शेतकऱ्यांची वीज कनेक्शन धडाधडा तोडता आणि डोळ्यासमोर पीक करपून जाते. राजेंद्र तुकाराम चव्हाण यांनी सोलापूर बाजार समितीत 10 पोती कांदे विकल्यावर त्याला किती पैसे आले ..ते बघा.. निर्लज्ज व्यापाऱ्याला दोन रुपयांचा चेक देताना लाज कशी वाटली नाही. व्यापारी शेतकऱ्याला सांगतो 15 दिवसाने हा चेक वटेल…
राज्यकर्त्यांनो जरा तरी लाज बाळगा, शेतक-यांनी जगायचं कसं हे आता तुम्हीच सांगा? एका बाजूला थकबाकी पोटी शेतक-यांची वीज कनेक्शन धडाधड तोडता आणि डोळ्या समोर पीक करपून जातं. राजेंद्र तुकाराम चव्हाण यांनी सोलापूर बाजार समितीमध्ये १० पोती कांदे विकल्यावर त्याला किती पैसे आले,
— Raju Shetti (@rajushetti) February 22, 2023
राज्यातील बहुतांश शेतकरी हा कांदा उत्पादक आहे. कांद्याला हवा तसा भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. दरम्यान एपीएमसी बाजारपेठेत देखील कांद्याचे दर मोठ्याप्रमाणात घसरले आहेत. घाऊक बाजारात किलोमागे पाच ते आठ रुपयांची घसरण झाली. कांद्याच्या दरात गेल्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात घसरण सुरूच, त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे. दरम्यान यावर लवकरात-लवकर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने जातीने लक्ष घालण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.