भारत हा शेतीप्रधान देश असल्यामुळे मोठया प्रमाणात लोक खेडेगाव, पाडे, वाडया या विभागात रहातात. भारतातील बहुसंख्य भाग हा जंगलांनी व्यापला आहे. भारतात समुद्रसपाटीलगतचा प्रदेश, डोंगररांगातील प्रदेश, डोंगरावरील नैसर्गिकरित्या सपाट पठारी प्रदेश अशी रचना दिसून येते. प्रत्येक विभागातील जनजीवनामध्ये विविधता आहे.
साधारण विचार केला तर मुंबई व मुंवई उपनगर सोडले तर बाकी सर्व विभाग हा शेती, पशुपालन, दुग्ध व्यवसाय होत असतो, तर डोंगराळ भागातील लोकांना चांगल्या प्रकारची शेती नसल्यामुळे केवळ जंगल संपत्ती वर जगावे लागते. डोंगराळ भागातील मूळ रहिवासी असल्यामुळे त्यांना जंगलाची चांगली माहिती असते. प्रत्येक ऋतुनुसार निसर्ग वेगवेगळी मानवास उपयुक्त निर्मिती करीत असतो. पावसाळ्यात येणाऱ्या रानभाज्या, हिवाळ्यात येणारी फळझाडे, उन्हाळ्यात येणारी जांभळे, करवंदे, कैऱ्या, इतर रानमेवा तयार होत असतो.
हिवाळ्यामध्ये रानातल्या बोरांनी भरून जातात. ही बोरे गोळा करून गावापाड्यावरील महिला, शाळकरी मुले शहरात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बोरे विकण्यासाठी बसतात. शाळेच्या आवाराजवळ बसतात. एकटक नजर लावून बोरे कोणी विकत घेतात का या अपेक्षेने ग्राहकाकडे पहात असतात.थोडे फार विचारी लोक त्यांच्या जीवनाची कथा समजून काही खरेदीसुद्धा करतात. पण साधी भोळी मराठमोळी माणसे असल्यामुळे त्यांच्या वस्तू अगदी कवडीमोलांनी विकत घेण्याचा प्रयत्न करतात. काय ग बाई बोरे कशी वाटा दिलीस? ती सांगते ५ रुपयाला एक डबी तेव्हा आपली शिकलेलेली माणसे म्हणतात ५ रुपयाला ३ मापे दे, २मापे दे अशी सौदेबाजीच्या भाषेत संभाषण करतात.तेव्हा ती काही न बोलता आपली मान नकारार्थी हालवून काही बोलत नाही.अशा गावपाडयातील बहुसंख्य गरीब महिला, शाळकरी मुले प्रत्येक ऋतुमध्ये अगदी झ्तभर पोटाची खळगी भरण्यासाठी रानावनात भटकून या वस्तू गोळा करून बाजारात विकतात. त्यावरच त्यांची उपजिविका असते. आपण त्यांच्याशी साध्या प्रेमळ भाषेत बोलो तर ते पैशाची पर्वा न करता आपला रानमेवा मुबलक प्रमाणात देतात.
ही माणसे फार शांत व समाधानी असतात जे मिळेल त्यामध्ये समाधान मानतात. मुलांना साधा वडापाव, शेव, चिवडा, बटर,टोस्ट असा खाऊ घेऊन घरी जातात. घरी गेल्यावर मुले गोळा होतात.जे आणले आहे त्याला नाव न ठेवता हातात मिळेल ते गबागबा खातात. समाधानाने खाल्ल्यामुळे चांगले पचून जाते व त्रास होत नाही. भुकेने व्याकूळ झालेली बालके काही खाल्ले तरी त्याचा त्रास त्यांना होत नाही. केवळ एक दिवसासाठी चालणारा हा त्यांचा व्यवसाय त्यांना कितीतरी समाधानी दिसून येतो. दुसऱ्या दिवसाचा सूर्य उगवेल तेव्हा दुसऱ्या दिवसाची सुरुवात व दुसऱ्या दिवसाचा उदरनिर्वाह अशी जीवनशैली असते.
जंगलातून आणलेली जंगली मेवा हा आपल्या लोकांना आहाराचा एक नैसर्गिक खजिना असतो. कोणत्याही प्रकारची रासायनिक प्रक्रिया न केलेल्या वस्तू आपल्यासाठी उत्तम आहार आहे याची जाणीव करून देतो. मात्र आपण त्यांना पैसे देतांना विचार करतो हे काही बरोबर वाटत नाही. त्यांच्याकडून वस्तू घेतांना मात्र व्यवहार बघू नये असे मला वाटते.
माणसांचे आयुर्मान जर वाढवाचे असेल तर वनसंपत्ती वाचवली पाहिजे. त्यामुळे गरीबांना रोजगार व शहरी जीवनातील लोकांना नैसर्गिक आहार मिळेल अशी अशा वाटते. फक्त विचार माणसाच्या जीवनाचा आरोग्यदायी जीवन जगण्याचा व्हावा. पैशाचा नाही हे लक्षात घ्यावे.