टीम लय भारी
मुंबई : निसर्ग या चक्रीवादळाने कोकणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. या नुकसानीच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दोन दिवस कोकण दौ-यावर जाणार आहेत. शरद पवार हे (Sharad Pawar on a two-day Konkan tour) ९ जूनला रायगड आणि १० जून रत्नागिरी जिल्ह्यातील भागाची पाहणी करुन शेतक-यांच्या भेटी घेऊन संपूर्ण माहिती जाणून घेणार आहेत.
दिनांक ९ जून रोजी सकाळी ८.३० वाजता मुंबईतून गाडीने प्रयाण करणार आहेत. सकाळी ११. ३० वाजता माणगाव, १२.३० वाजता म्हसळा, १ वाजता दिवेआगार, २ वाजता श्रीवर्धन, ४ वाजता श्रीवर्धन येथे आमदार, खासदार आणि अधिकारी यांच्यासमवेत बैठक, सायंकाळी ५ वाजता हरिहरेश्वर आणि नंतर ६ वाजता बागमांडला मार्गे दापोलीकडे रवाना होणार आहेत.
दापोली येथे मुक्काम करणार आहेत. दरम्यान यावेळी राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनिल तटकरे, रायगडच्या पालकमंत्री आणि विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे व स्थानिक आमदार उपस्थित राहणार आहेत. दिनांक १० जून रोजी रत्नागिरी जिल्हा दौरा असून सुरुवातीला दापोली येथील नुकसानीची पाहणी करणार आहेत.
निसर्ग या चक्रीवादळाचा तडाखा हा सर्वाधिक बसला तो रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला. अनेक शेतक-यांचं, आंबा उत्पादकांचं मोठं नुकसान झाले आहे. दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कोकण दौरा केला. १०० कोटींची तातडीची मदत त्यांनी जाहीर केली. आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे उद्यापासून दोन दिवस कोकण दौ-यावर जात आहेत. इथल्या शेतक-यांच्या समस्या ते जाणून घेणार आहेत.
कोकणातल्या नुकसानग्रस्तांना पुन्हा कसे उभे करायचे यावर चर्चा झाली. रायगड, रत्नागिरी, पुणे आणि इतर जिल्ह्यातील शेतीचं झालेले नुकसान कसे भरुन काढायचं, तसेच कोकणातल्या फळबागांना विशेष मदत देऊन या फळबागा उभ्या करण्याबाबत सरकारसमोर गहन प्रश्न उभा राहिला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या कोकण दौ-याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.