टीम लय भारी
मुंबई :- महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाण वाढत असल्याने रेमडेसिवीरची मागणी वाढली आहे. अनेक ठिकाणी या इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. महाराष्ट्रातही रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी लोकांनी लांबच लांब रांगा लावल्या आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरु आहेत. या संदर्भात आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
‘रेमडेसिवीरचे जे निर्यातदार आहेत. ज्यांच्यावर बंदी आहे. हे निर्यातदार जर त्यांचा माल आपल्याला देऊ शकले किंवा सात कंपन्यांच्या मार्फत देखील देऊ शकले. तरी देखील आपल्या राज्याच्या तातडीच्या दृष्टीने उपयुक्त ठरु शकते,’ असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
‘केंद्र शासनाने ज्या कंपन्यांच्या निर्यातीवर बंदी घातली आहे त्या कंपन्यांनी जर आपल्या राज्य शासनाला निर्यातीसाठी तयार केलेला रेमडेसिवीरचा जो साठा आहे, तो दिला तर या पाच-सात दिवसात आपली जी काही कमतरता आहे ती दूर होईल,’ असेही टोपे यांनी म्हटले आहे.
‘१५ कंपन्यांना निर्यात बंदी केली आहे, त्यांच्याकडे माल तयार आहे. केवळ निर्यात बंदी केलेला माल आपल्याला मिळू शकेल का? यासाठीचा प्रयत्न केला जात आहे. ते जर कायदेशीरदृष्टीने यशस्वी झाले तर काही अडचण राहणार नाही,’ अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.