टीम लय भारी
मुंबई : राज्याचे मुख्य सचिव म्हणून संजयकुमार यांनी आज सूत्रे हाती घेतली. मावळते मुख्य सचिव अजोय मेहता यांनी संजयकुमार यांच्याकडे कार्यभार सोपविला ( SanjayKumar received charge of Chief Secretary ).
अजोय मेहता यांचा मुख्य सचिव पदाचा कार्यकाळ आज संपुष्टात आला. नवे मुख्य सचिव म्हणून संजयकुमार यांच्या नियुक्तीचा आदेश गेल्या आठवड्यातच जारी करण्यात आला होता. त्यानंतर आज संजयकुमार यांनी पदाची सूत्रे हाती घेतली.
मावळते मुख्य सचिव अजोय मेहता यांनी संजयकुमार यांच्याकडे पदाची सूत्रे हस्तांतरीत केली, त्यानंतर मेहता यांनी पुष्पगुच्छ देवून संजयकुमार यांचे अभिनंदन केले ( Ajoy Mehta handover chrge to Sanjaykumar ).
अजोय मेहता मंत्रालयातच
अजोय मेहता मुख्य सचिव पदावरून निवृत्ती झाले आहेत. परंतु मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासाठी त्यांना स्वतंत्र दालनही तयार करण्यात आले आहे. कोरोना व्हायरसच्या नियोजनाची जबाबदारी ते पार पाडतील असे सूत्रांनी सांगितले ( Ajoy Mehta will be continue in Mantralaya ).
कोरोना नियंत्रणाबरोबरच अर्थव्यवस्थेला गती देणार : संजयकुमार
राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेल्या संजय कुमार यांनी सेवा निवृत्त मुख्य सचिव अजय मेहता यांच्याकडून आज पदभार स्विकारला. कोरोना नियंत्रणासाठी राज्यात सुरू असलेल्या उपाययोजनांची प्रभावी अमंलबजावणी करतानाच अर्थव्यवस्थेला बळकटी, खरीप हंगामासाठी केलेल्या नियोजनाला मूर्त स्वरूप देण्याला प्राधान्य असेल, असे मुख्य सचिव संजय कुमार यांनी याप्रसंगी सहकाऱ्यांशी चर्चा करताना सांगितले.
यावेळी विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव यांनी उपस्थित राहून नवनियुक्त मुख्य सचिवांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.
पदभार स्वीकारल्यानंतर मुख्य सचिव म्हणाले की, राज्य गेल्या चार महिन्यांपासून राज्याचे प्रशासन कोरोना संकटाचा यशस्वी मुकाबला करीत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या उपाययोजनांची प्रभावीपणे अमंलबजावणी केली जाईल.
राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी प्रयत्न करतानाच राज्यातील खरीप हंगामासाठी जे नियोजन करण्यात आले आहे त्याला मूर्त स्वरूप देण्यात येईल. पावसाळा सुरू झाला आहे. याकाळात रोगराईचे प्रमाण वाढू शकते तो रोखण्यासाठी उपाययोजना हाती घेण्यात येतील.
मुख्य सचिव संजय कुमार हे भारतीय प्रशासन सेवेच्या १९८४ च्या तुकडीचे असून आता पर्यंतच्या ३६ वर्षांच्या सेवा काळात त्यांनी विविध पदांवर काम केले आहे. १९८५ मध्ये अमरावतीचे सहायक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या संजय कुमार यांची त्यानंतर बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले.
१९९७ मध्ये उपमुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे सदस्य सचिव, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी, एकात्मिक बाल विकास प्रकल्पासाठी जागतिक बॅंकेचे प्रकल्प समन्वयक, उर्जा नियामक आयोगाचे सचिव, पुणे महापालिका आयुक्त, राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष, औरंगाबाद विभागीय आयुक्त, शालेय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण, अल्पसंख्याक विभागाचे प्रधान सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले तर महिला व बालकल्याण, गृहनिर्माण या विभागांचे अपर मुख्य सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यांच्याकडे गृह विभागाचा अतिरीक्त कार्यभारही देण्यात आला होता.