29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
HomeमुंबईMumbai Local : ‘रेल्वेच्या विरोधात बॉम्ब तयार आहे, वात पेटवावी लागेल’

Mumbai Local : ‘रेल्वेच्या विरोधात बॉम्ब तयार आहे, वात पेटवावी लागेल’

पश्चिम व मध्य रेल्वेवर दररोज सुमारे ४० लाख चाकरमानी प्रवास करतात. असे असताना वातानुकूलित गाड्यांच्या फेऱ्या वाढवून गोरगरीब प्रवाशांची टिंगल करण्याचाच हा प्रकार आहे.

मध्य व पश्चिम रेल्वेमधील (Mumbai Local) गर्दीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्या विरोधात आता माजी मंत्री व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रणशिंग फुंकले आहे. रेल्वेचे अधिकारी वातानुकूलित गाड्यांचा (AC Local) फेऱ्या वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. पण सामान्य लोकांसाठी असलेल्या साध्या गाड्यांच्या फेऱ्या कमी करीत आहे. रेल्वेच्या विरोधात लोकांचा संताप वाढत चालला आहे. बॉम्ब तयार आहे. केवळ वात पेटविण्याची गरज आहे, अशा शब्दांत आव्हाड यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

आव्हाड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला आहे. एकिकडे दैनंदिन कामासाठी प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे. दूरवरून प्रवाशी येत असतात. त्यांना दररोज ये – जा करावी लागते. पश्चिम आणि मध्य अशा दोन्ही रेल्वे मार्गांवर प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे परिस्थिती तशी बिकटच आहे. पण त्यावर रेल्वे प्रशासन उपाय शोधत नाही.

उलट साधा कोच असलेल्या रेल्वेच्या फेर्‍या कमी करून वातानुकूलित गाड्या वाढविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. वास्तवात सामान्य लोकांना साध्या रेल्वेचे तिकीट परवडत नाही. महिन्याचा पास परवडत नाही. मग वातानुकूलित गाड्यांचा प्रवास कसा काय परवडणार. एक प्रकारे सर्वसामान्यांच्या हालअपेष्टांमध्ये अजून वाढ करण्याचाच निर्णय पश्चिम रेल्वे आणि मध्ये रेल्वेने घेतला असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे.

पश्चिम व मध्य रेल्वेवर दररोज सुमारे ४० लाख चाकरमानी प्रवास करतात. असे असताना वातानुकूलित गाड्यांच्या फेऱ्या वाढवून गोरगरीब प्रवाशांची टिंगल करण्याचाच हा प्रकार आहे. वातानुकूलित प्रवास परवडू शकेल अशा प्रवाशांची संख्या १० टक्के सुद्धा नाही. पण या १० टक्के प्रवाशांसाठी वातानुकूलित गाड्यांच्या फेऱ्या वाढवून ९० टक्के प्रवाशांवर अन्याय केला जात आहे. हा क्रुरपणा असल्याचा संताप आव्हाड यांनी व्यक्त केला आहे.

अनेक निष्पाप प्रवाशांचा जीव रेल्वे अपघातामध्ये जातो. त्यांची संख्या सुद्धा सतत वाढत आहे. गाडीमध्ये व्यवस्थित चढता येत नाही, अशी परिस्थिती आहे. मुंब्रा, कळवा, दिवा या स्थानकांवरील परिस्थिती बिकट आहे. मुलुंड, भांडुप, विक्रोळी यांचीही स्थिती तेवढीच भयंकर असल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे.

पश्चिम आणि मध्ये रेल्वेच्या सर्वच स्थानकांवरील परिस्थिती अत्यंत बिकट व वेदनादायी आहे. परंतु रेल्वे प्रशासनाला याची फिकीर नाही. ते याबाबत विचार करीत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे याचा स्फोट होईल हे मी लक्षात आणून देत आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी, व या खात्याच्या मंत्र्याने याकडे त्वरीत लक्ष द्यावे.

मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे ही मुंबई, ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्याची जीवनवाहिनी आहे. हा इशारा समजा किंवा सुचना समजा. व्यवस्था सुधरायला हवी. नाहितर फक्त वात पेटवण्याची गरज आहे. बॉम्ब तयार झाला आहे. आणि परवाच त्याचे दर्शन कळव्यात घडलेले आहे, अशा शब्दांत आव्हाड यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी