सोमवार (18 सप्टेंबर) पासून सुरू झालेल्या संसदेच्या पाच दिवसीय विशेष अधिवेशनाचा आज बुधवारी, (20 सप्टेंबर) तिसरा दिवस आहे. मागील दोन दिवसांत ह्या विशेष अधिवेशनात अनेक घडामोडी घडल्या असून नवीन संसद इमारतीतील प्रवेश, महिला आरक्षण यांसारख्या अनेक विषयांमुळे हे अधिवेशन चर्चेत राहिले आहे. यातच आता भाजपने संविधानातून धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे दोन शब्द हटवल्याचा आरोप होत असून विरोधी पक्षांनी यावर तीव्रपणे आक्षेप घेतला आहे. कॉँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी याबाबत एएनआय या वृत्तसंस्थेला माहिती देताना सांगितले.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेच्या इतिहासाविषयी तसेच कामकाजाविषयी चर्चा करण्यात आली. अधिवेशनाचा दूसरा दिवस हा संसदेच्या नवीन इमारतीत घेण्यात आला. यावेळी, लोकसभा आणि राज्यसभेच्या सर्व सदस्यांना या विशेष दिवसाची आठवण म्हणून संविधानाची प्रत, संसदेच्या इतिहासावरील पुस्तके, एक विशेष नाणे आणि स्टॅम्प देण्यात आला. मात्र, खासदारांना दिल्या गेलेल्या राज्यघटनेतून धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे शब्द वगळण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा विरोधी पक्षातील नेत्यांनी केला.
#WATCH | Leader of Congress in Lok Sabha, Adhir Ranjan Chowdhury says, “The new copies of the Constitution that were given to us today (19th September), the one we held in our hands and entered (the new Parliament building), its Preamble doesn’t have the words ‘socialist… pic.twitter.com/NhvBLp7Ufi
— ANI (@ANI) September 20, 2023
अधीर रंजन चौधरींनी केला खुलासा
कॉँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी एएनआय या वृतासंस्थेला दिलेल्या मुलाखतीत याबाबत खुलासा केला. ते म्हणाले, “आम्हाला जी नवीन राज्यघटना दिली आहे त्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेत धर्मनिरपेक्ष, समाजवादी हे शब्द वगळल्याचे आढळले. हे दोन शब्द १९७६ साली करण्यात आलेल्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आले होते यांची आम्हाला कल्पना आहे. पण आम्हाला देण्यात आलेल्या राज्यघटनेत जर धर्मनिरपेक्ष व समाजवादी हे शब्द नसतील, तर ही फार चिंतेची बाब आहे”,
हे ही वाचा
लोकसभा, विधानसभेत आता महिलांना मिळणार 33% आरक्षण
‘महिला आरक्षण विधेयक’ आज लोकसभेत मंजूर होणार? महिलांना मिळणार 33% आरक्षण!
संसदेचे विशेष अधिवेशन ऐतिहासिक निर्णयाचं असेल,अधिवेशनापूर्वी मोदींनी केले सूचक व्यक्तव्य!
“मी ही बाब राहुल गांधींच्या नजरेत आणून दिली. सत्ताधाऱ्यांनी फार हुशारीनं हे काम केलं आहे. याबाबत, आम्ही काही बोलण्याचा प्रयत्न केला, तर सुरुवातीपासून हेच होतं, असं ते म्हणू शकतात. पण यामागे त्यांचा हेतू चुकीचा असल्याचे समजते. त्यांनी मोठ्या चलाखीने दिलेल्या संविधानातून समाजवादी व धर्मनिरपेक्ष हे शब्द हटवले आहेत. मी संसदेत याबद्दल वारंवार बोलण्याचा प्रयत्न करत होतो. पण बोलण्याची संधीच मला दिली गेली नाही”, असा आरोप चौधरी यांनी केला.