28 C
Mumbai
Tuesday, September 17, 2024
Homeराष्ट्रीयलोकसभा, विधानसभेसह महापालिकेच्याही निवडणुका...

लोकसभा, विधानसभेसह महापालिकेच्याही निवडणुका…

विरोधी पक्षांनी एकजूट केलेल्या ‘इंडिया’ गटाची पत्रकार परिषद नुकतीच पार पडली. यावेळी पत्रकारांनी एक प्रश्न विचारला. लोकसभेसोबतच विधानसभेचीही निवडणूक घेण्याची तयारी केंद्राने केली आहे. डिसेंबरमध्ये चार राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. त्यावेळीच लोकसभेच्याही निवडणुका घेण्याचा केंद्राचा विचार असल्याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, लोकसभा – विधानसभेसोबतच महापालिकेच्याही निवडणुका घेण्याची हिंमत केंद्राने दाखवावी. तेवढे धाडस ते करणार नाहीत. निवडणुकांना सामोरे जाण्याची हिंमत सत्ताधाऱ्यांमध्ये नाही, अशी टीका ठाकरे यांनी केली.

पंतप्रधान पदाच्या चर्चेवरून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. पंतप्रधानपदासाठी आमच्याकडे भरपूर पर्याय आहेत. पण भाजपकडेच पर्याय नाहीत. नरेंद्र मोदी यांच्यामुळे भाजपचा सगळीकडे पराभव होत आहे. कर्नाटकात भाजपचा दारूण पराभव झाला आहे. लोकांचा मोदी यांच्या चेहऱ्यावर विश्वास राहिलेला नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेनेचा पंतप्रधान होऊ शकतो का, असा पत्रकारांनी प्रश्न विचारला असता. मी उद्याच जातो आणि पंतप्रधानपदाची शपथ घेतो, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी खिल्ली उडविली.

निती आयोगासोबत झालेल्या बैठकीत मुंबईचा विकास केंद्र सरकार करणार असल्याची घोषणा झाल्याकडे उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, भाजपने महाविकास आघाडीचे सरकार का पाडले हे जनतेच्या लक्षात आले असेल. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा हा डाव आहे. मुंबई केंद्रशासित अथवा वेगळी करण्याचे षडयंत्र सुरू आहे. दिल्लीत सुद्धा असाच डाव होता. तिथे वटहुकूम आणला गेला होता. तसाच प्रयत्न मुंबईच्या बाबतीत सुद्धा सुरू आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना हे करणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी आमचे सरकार पाडले. आगामी निवडणुकांमध्ये आम्ही सत्तेत येवू. तेव्हा केंद्र सरकारने मुंबईच्या पायात घातलेले साखळदंड आम्ही काढून टाकू.

संविधाननुसार आपल्याकडे हे संघराज्य पद्धत आस्तित्वात आहे आहे. दोन – तीन विषय सोडले तर केंद्राला राज्यात हस्तक्षेप करता येत नाहीत. पण केंद्र सरकार राज्यात हस्तक्षेप वाढवत आहे. राज्याची स्वायत्तता ते मोडत आहेत. मात्र केंद्राने घेतलेले निर्णय आम्ही तोडून टाकू, असेही ठाकरे म्हणाले. इंडियाची बैठक आयोजित केली की, ते महायुतीचीही बैठक आयोजित करतात. आता एनडीएची अवस्था अमिबासारखी झाली आहे. त्याचा आकार हवा तसा बदलवला जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत शिवसेनेची युती जाहीर झालेली आहे. आता आम्ही प्रकाश आंबेडकरांशी बोलून चर्चा करू. त्यांची तयारी असेल तर राज्यात महाविकास आघाडीसोबत व देशात ते इंडियासोबत येऊ शकतील, असेही ठाकरे यांनी सांगितले.

‘सामना’तून सतत शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली जाते, याकडे लक्ष वेधले असता, आम्ही ज्या पक्षाबरोबर असतो त्यांच्यावर टीका करतो. पूर्वी भाजपवर टीका करायचो, असे उद्धव ठाकरे म्हणाले. राज्यात व देशात सरकार दिसत नाही. मणीपूरमध्ये महिलांची धिंड काढली जाते. महिला कुस्तीपटूंना आंदोलन करावे लागते. महिलांना सुरक्षित वातावरण राहिलेले नाही. राज्यात दुष्काळासारखी स्थिती उद्भवली आहे. पण राज्य सरकार त्यावर काहीही बोलायला तयार नाही, असे ठाकरे म्हणाले.

देशाची सुरक्षा करण्यासाठीच आम्ही एकत्र आलो आहोत. तानाशाही, जुमलेबाजीपासून देश वाचवायचा आहे. लोकांना स्वातंत्र्य हवे आहे. भाजप चले जावची गरज आहे. देशाला विकास हवा आहे, आणि स्वातंत्र्य सुद्धा हवे आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. सरकार गॅसवर आहे. त्यामुळे सिलेंडरचे भाव कमी केले आहेत. इंडियाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सिलेंडरचे भाव कमी केले असल्याचे ठाकरे म्हणाले. गेल्या नऊ वर्षात नरेंद्र मोदी यांना बहिणींची आठवण झाली नाही. आताच कशी झाली, असाही सवाल ठाकरे यांनी विचारला.

अजित पवार काही आमदारांसह सत्तेत सहभागी झाले आहेत. पण प्रत्यक्षात मात्र ‘शरद पवार व अजित पवार हे आतून एकच आहेत’. पत्रकारांनी विचारलेल्या या प्रश्नावर शरद पवार यांनी थेट उत्तर दिले आहे. आमच्यात कसलीही एकजूट नाही. आगामी निवडणुकांमध्ये अजित पवार गटाला जनता जागा दाखवून देईल, असे स्पष्टपणे शरद पवार यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर, जलसंपदा घोटाळा व महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्याची चौकशीही नरेंद्र मोदी सरकारने करावी, असे थेट आव्हान सुद्धा शरद पवार यांनी यावेळी दिले. शरद पवार यांनी अजित पवार यांचे नाव घेतले नाही. परंतु जलसंपदा व शिखर बँकेचा उल्लेख करून त्यांनी थेट अजित पवारांवरच तोफ डागली.

हे सुद्धा वाचा 

आशिया चषक २०२३: पाकिस्तानबद्दल हे काय म्हणाला अश्विन?
शरद पवारांचे नरेंद्र मोदींना आव्हान, अजितदादांचा भ्रष्टाचार उघड करा
उद्धव ठाकरे पंतप्रधानपदाची शपथ घेणार

विरोधी पक्षांची एकजूट असलेल्या ‘इंडिया’ची बैठक ग्रँट हयात हॉटेलमध्ये सुरू होणार आहे. या संभाव्य बैठकीच्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शरद पवार, उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण यांच्यासह विविध नेते उपस्थित होते. इंडियातील घटक पक्ष एकत्र येवून पुढील निवडणुका लढवणार आहोत. पहिल्या दोन बैठका एकत्र येण्याच्या दृष्टीने महत्वाच्या होत्या. निवडणुका कशा लढायच्या, जागा वाटप कसे करायचे याबाबत मुंबईतील या बैठकीत चर्चा होऊ शकते, असेही शरद पवार म्हणाले.

मायावती यांचा भाजपसोबत सुसंवाद आहे. त्यामुळे त्यांची नक्की भूमिका काय आहे हे समजून घेतल्यानंतर त्यांच्याही इंडियातील समावेशाविषयी निर्णय घेतला जाईल, असे पवार म्हणाले. विविध राजकीय पक्ष आम्ही एकत्र आलो आहोत. पंतप्रधानपदासाठी आमच्याकडे भरपूर पर्याय आहेत. पण आम्ही एकत्र येवून त्यावर चर्चा करू, असेही पवार म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी