टीम लय भारी
मुंबई : पुढील चार महिन्यात भाजपचे अनेक आमदार महाविकास आघाडीच्या गोटात सामील होतील, असा गौप्यस्फोट करुन राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील (jayant Patil) यांनी भाजपचे दहा पेक्षा अधिक आमदार नाराज असून लवकरच राष्ट्रवादीमध्ये मेगा भरती होणार असल्याची माहिती दिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर जयंत पाटील यांनी दिलेल्या माहितीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जयंत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली आहे. ते म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून अनेक सदस्य चर्चा करत आहे. हाताच्या दोन्ही बोटांपेक्षा जास्त सदस्य भाजपामध्ये नाराज आहेत, त्यांच्यातील बऱ्याच जणांचा राष्ट्रवादीकडे येण्याचा कल आहे. यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल असे पाटील यांनी सांगितले. जयंत पाटील यांच्या वक्तव्यामुळे राजकीय गोटात एकच खळबळ उडाली आहे. यावेळी त्यांनी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये लवकरच मेगाभरती होणार असल्याचे संकेत दिले आहेत.
वनविरोधी लोकांना उकळ्या फुटायची गरज नाही
कांजूरमार्गावरील मेट्रो कारशेडसंदर्भात न्यायालयाने दिलेल्या आदेशासंदर्भात बोलताना जयंत पाटील म्हणाले, स्टे दिलेला असला तरी अंतिम सुनावणी बाकी आहे. आरेच्या भागात वन क्षेत्र आहे, त्यात वनविरोधी जे लोक आहेत, त्यांना उकळ्या फुटायची गरज नाही. मुंबईच्याजवळ वन असणे हे मुंबईकरांसाठी भाग्याचे आहे. तिथे प्रकल्प केले तर पर्यावरण हानी होते, सरकारने भूमिका घेतली त्यावर इतकं अकांततांडव करण्याची गरज नाही. राजकीय हितासाठी काही जण राजकारण करत आहेत.