टीम लय भारी
मुंबई : केंद्र सरकारने अलीकडेच जपानसोबत काही साम्यंजस्य करार केले आहेत. यात केंद्र सरकारने कुशल कामगारांच्या भागीदारीसाठी ( Specified Skilled Workers) जपानसोबत केलेल्या कराराचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी स्वागत केले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे भारत व जपान यांच्यातील सहकार्य आणि भागीदारीसाठी संस्थात्मक यंत्रणा उभारली जाईल असा विश्वास आ. पवारांनी व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात, केंद्र असो वा राज्य सरकारच्या निर्णयावर ते भाष्य करतात. अनेकदा केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांवरून त्यांनी टीका केली आहे, स्वत:वरील टीकेलाही योग्य शब्दात उत्तर दिले आहे. तसेच काही निर्णय घेतले गेले तर त्याचे कौतुकही करायला विसरत नाही. त्याचाच प्रत्यय पुन्हा दिसून आला आहे. त्यांनी मोदी सरकारच्या निर्णयाचे कौतुक केले आहे.
आ. पवार म्हणाले की, आवश्यक कौशल्य प्राप्त केलेले आणि जपानी भाषा अवगत असणारे भारतीय मनुष्यबळ जपानमधील विविध 14 क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी पाठवणं सोपे होणार आहे. या संधीचा फायदा देशातील सर्व राज्यातील युवांना समान पद्धतीने मिळावी अशी विनंतीही आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे.
केंद्रीय कॅबिनेटने भारत आणि जपान यांच्यात कुशल कामगारांच्या भागीदारीसाठी साम्यंजस्य करार करण्याला हिरवा कंदील दाखवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याला मंजुरी देण्यात आली. अंतर्गत भारत आणि जपान यांच्यात सहकार्य आणि भागीदारी असलेली संस्थात्मक यंत्रणा उभी राहील. त्यामुळे भारत आणि जपान यांच्या नागरिकांमधील एकमेकांची संपर्क वाढण्यास मदत होणार आहे. या करारानुसार भारतातील कुशल कामगारांना जपानमध्ये पाठण्यास सहकार्य मिळेल, जपानमधील 14 विविध क्षेत्रात त्यांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत.