मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारकडे अवघे १० दिवस शिल्लक आहेत. या १० दिवसांत सरकारने निर्णय घ्यावा. आता एक इंचही मागे हटणार नाही, असा इशाराच मनोज जरांगे-पाटील यांनी राज्य सरकारला दिला. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये गावातील आजच्या महाविराट सभेत जरांगे-पाटील यांनी हा इशारा दिला आहे. सरकारने वेळेत निर्णय न घेतल्यास २२ ऑक्टोबरला आंदोलनाची दिशा स्पष्ट करणार, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण द्यावे, तसेच मराठ्यांना सरसकट कुणबी जातप्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी जरांगे-पाटील यांनी केले. आता कायमस्वरुपी टिकणारे आरक्षण हवे, अशी मागणी जरांगे-पाटील यांनी केली. या इशाऱ्यामुळे मराठा समाज आरक्षणासाठी किती आक्रमक आहे हे आज पुन्हा दिसले, तर सरकार बॅकफूटवर गेल्याचेही स्पष्ट झाले आहे.
यावेळी जरांगे-पाटील मराठा समाजाच्या महानायकाप्रमाणे भाषण करत होते आणि लाखोंचा समुदाय त्याचं भाषण ऐकत होता, त्यांना टाळ्यांतून प्रतिसाद देत होता. वाघ आला रे वाघ आला मराठा समाजाचा वाघ आला, अशी घोषणा जरांगे-पाटील यांच्यासाठी होत होत्या. यावेळी जरांगे पाटील यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. ‘तुमचा मुलगा म्हणून सांगतोय, मराठ्यांच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय हा मनोज जरांगे एक इंचही मागे हटणार नाही. सरकारला ही शेवटची विनंती आहे की, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी स्थापन केलेल्या समितीचे काम आता बंद करा. आधार घेऊन कायदा करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. आता तर पाच हजार पानांचा पुरावा समितीला मिळाला आहे. मग याच आधारावर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या आणि मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करा’, अशी मागणी जरांगे-पाटील त्यांनी केली.
मराठा म्हणजे ‘आग्या मोहोळ’
आज मराठ्यांचं आग्या मोहोळ शांत आहे, हे आग्या मोहोळ एकदा उठले तर आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही, असा इशारा जरांगे-पाटील यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारला महाविराट सभेच्या माध्यमातून दिला. मराठा समाज गरीब आहे. शेती करून जगतो आणि देशालाही अन्नधान्य पुरवतो. तरीही मराठ्यांची लेकरे आरक्षणापासून वंचित आहेत. या पोरांना नोकरी लागली पाहिजे, ही मागणी आहे. म्हणून सरकारने तातडीने मराठा आरक्षण लागू करावे, अशी मागणी जरांगे-पाटील यांनी केली.
पंतप्रधानांनी फडणवीसांनी समजा द्यावी
मराठ्यांना आरक्षणात काही अडथळे आणले जात आहेत. म्हणून पंतप्रधानानांनी देवेंद्र फडणवीसांना समज द्यावी. मराठ्यांना आरक्षण द्या, लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील, असेही जरांगे म्हणाले
- जरांगे-पाटील यांनी कोणत्या मागण्या केल्या आहेत?
१. कोपर्डीतील भगिनीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशी द्यावी
२. मराठा आरक्षणासाठी बळी गेलेल्या ४५ बांधवांच्या कुटुंबाना आर्थिक मदत करावी आणि त्याच्या कुटुंबातल्या एकाला सरकारी नोकरीत समावून घ्यावे
३. दर दहा वर्षांनी आरक्षण दिलेल्या ओबीसी बांधवांचे सर्वेक्षण करून त्यातून प्रगत जाती बाहेर काढाव्यात
४. ‘सारथी’ संस्थेमार्फत पी.एच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक निधी देऊन त्यांचे प्रश्न सोडवावेत
५. राज्यातील मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या आत मराठा म्हणून वेगळा प्रवर्ग करुन आरक्षण दिले तरी चालेल
६. मराठा समाजाला कायमस्वरुपी टिकणारे आरक्षण द्यावे
हे ही वाचा
मराठ्यांच्या मराठवाड्यातील महाविराट सभेत काय घडणार?
आता ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश
‘बाकीच्या जागा जिंकता येतील पण बारामती…’ चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटी गावात बेमुदत उपोषण सुरू केले होते. पण १ सप्टेंबर रोजी पोलिसांनी या उपोषणकर्त्यांवर लाठीमार केला आणि तेव्हापासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन आणखी चिघळले.
- मराठ्यांच्या महाविराट सभेतील महत्त्वाच्या घडामोडी
- प्रचंड गर्दी पाहून जरांगेंना अश्रू अनावर झाले
- राज्यभरातून लाखोंच्या संख्येने मराठा समाज एकवटला
- मनोज जरांगे-पाटील यांचा मराठा समाजाचे नेते म्हणून उदय
- अजित पवारांनी भुजबळांना समज देण्याची जरांगेंची मागणी
- भुजबळ नादाला लागले तर सोडणार नाही – जरांगे
- मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकारकडे आणखी १० दिवस
- मराठा समाजाला ‘आग्या मोहोळ’ची उपमा
- मराठा आरक्षणाच्या झारीतील शुक्राचार्य कोण? -जरांगे