मुंबईच्या वेशीवरील टोलनाक्यांवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. माझी माणसे टोलनाक्यांवर थांबतील, लक्ष ठेवतील. आणि जर कोणी विरोध केला तर टोलनाके जाळून टाकू, असा इशारा राज ठाकरे यांनी सरकारला दिला आहे. यावरून मनसेने पुन्हा एकदा टोलनाके हा विषय अजेंड्यावर घेतलेला दिसत आहे. त्याचवेळी टोल हा राज्यातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. पाच दिवसांपूर्वी मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी टोलदरवाढीवरून ठाणे टोलनाक्यावर उपोषणाला बसले होते. त्यांनी चार दिवस उपोषण करूनही सरकारने दखल न घेतल्याने अखेर राज ठाकरेंनी अविनाश जाधव यांची काल (८ ऑक्टोबर) भेट घेऊन त्यांना उपोषण मागे घ्यायला लावले आणि हा प्रश्न स्वत:च्या हातात घेत थेट मुख्यमंत्र्यांनी भेट घेणार असल्याचे स्पष्ट केले होते.
या संदर्भात राज ठाकरेंनी आज (९ ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेऊन थेट सरकारवर तोंडसुख घेतले. त्यांनी सत्ताधारी पक्षांना धारेवर धरत टाेलचा पैसा जातो कुठे? असा सवाल केला. स्स्त्यात जर खड्डे पडणार असतील आणि टोल भरत असताना आपण रोड टॅक्सही भरत असू तर सगळा पैसा जातो कुठे? असा सवाल राज ठाकरेंनी सरकारला केला आहे. यासोबत त्यांनी पुन्हा एकदा व्हिडीओ दाखवत सरकारची पोल केली आहे.
काय म्हणाले राज ठाकरे?
टोलचे पैसे माफ होणार नाहीत, टोल हे सरकारच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. टाेलचा पैसा जातो कुठे? असा सवाल करत चार चाकी गाड्यांकडून सरकारने टोल घेऊ नये, अशी राज ठाकरेंनी मागणी केली. आणि जर यावर सरकार अंमलबजावणी करत नसेल तर आम्ही टोलनाके जाळून टाकू, असा राज ठाकरेंनी सरकारला इशारा दिला आहे. त्यानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे नेते काय म्हणाले होते, हे मला दाखवायचे आहे. सरकार सतत बदलत राहते. पण जनतेच्या समस्या सुटत नाहीत, याकडेही राज ठाकरे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
हेही वाचा
राज ठाकरेंनी टोलवरून उपसली तलवार, थेट मुख्यमंत्री शिंदेंना केला सवाल
कुणबी आणि मराठे एकच? जरांगे पाटलांचा आकडेवारीसह दावा
इस्रायल-पॅलेस्टिनींमुळे जगावर युद्धाचे संकट, तर कॅनडा-इराणमध्ये जल्लोष
पुन्हा एकदा ‘लाव तो व्हिडीओ’
काही वर्षांपूर्वी राज ठाकरेंनी एका सभेत नेत्यांनी आश्वासने दिलेले व्हिडीओ दाखवले होते. आताही त्यांनी भाजप-शिवसेना, राष्ट्रवादी-कॉंग्रेस सरकारच्या काळातील टोलमाफीबाबत व्हिडीओ पत्रकार परिषदेत दाखवले. यावेळी पूर्वी असणाऱ्या सत्ताधारी नेत्यांनी आम्ही टोल माफ करतो, अशी आश्वासने दिली होती. यावेळी त्यांनी एकूण सात व्हिडिओ दाखवले आहेत. यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस तसेच दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या व्हिडीओंचा समावेश होता.
हे कमी म्हणून की काय राज ठाकरेंनी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचाही व्हिडीओ दाखवला. ‘आम्ही केवळ मोठ्या वाहनांचा टोल घेत आहोत. इतर कोणत्याही वाहनांकडून आम्ही टोल घेत नाही. असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे’, असे वक्तव्य यात देवेंद्र फडणवीसांनी केलेले आहे. त्याला प्रत्युत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, टोलनाक्यावर माझी माणसे थांबतील, लक्ष ठेवतील. जर कोणी विरोध केला तर टोलनाके जाळून टाकू, असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.