उन्मेष खंडागळे
नवोदित आमदार गोपीचंद पडळकर यांनी विखारी टीका केल्यानंतर अद्याप तरी शरद पवारांनी त्यांना ठोस प्रत्युत्तर दिलेले नाही. पुण्यात व साताऱ्यात पत्रकारांच्या प्रश्नावर त्यांनी पडळकर ( Sharad Pawar avoided to react on Gopichand Padalkar’s statement ) यांच्यावर बोलण्याचे टाळले.
पडळकरांनी मर्यादा सोडून आणि खालच्या पातळीवरील टीका केल्यानंतर आता शरद पवारांचे एक – एक गुण समोर येत आहेत.
शरद पवारांनी त्यांच्या पन्नास वर्षांच्या संसदीय राजकारणात केलेल्या कामाची जंत्रीच समोर येत आहे. बारामतीमधील शेती आणि उद्योग पाहण्यासाठी देशोदेशीचे अभ्यासक येऊन जातात. पडळकर सध्या ज्या पक्षाच्या कोट्यातून विधानपरिषदेत गेले आहेत त्या पक्षाचे सर्वोच्च नेते आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील बारामतीचा ‘विकास’ पाहण्यासाठी येतात ( Narendra Modi’s visit to Baramati ).
हे सुद्धा वाचा
पडळकरांच्या आडून भाजपने धनगर विरूद्ध मराठा भांडण लावले : अनिल गोटे यांचा आरोप
शरद पवार म्हणाले, ‘गोपीचंद पडळकरांविषयी मला बोलायचे आहे, पण…’
गोपीचंद पडळकर यांच्यावर धनगर नेतेही संतापले
पवारांनी पुण्याला उद्योग नगरी केले. त्यामुळेच पुणं आज आयटी हब झाले, हे पवारांचे विरोधकही मान्य करतात (Sharad Pawar developed to Pune ) . महाराष्ट्रात रुजलेली सहकार चळवळ पवारांनी भरभराटीस आणली. आज याच सहकारात घुसण्याचा आणि ग्रामीण राजकारणात पाय रोवण्याचा प्रयत्न भाजप नेतेही जोमाने करत आहेत.
पवारांनी फक्त पुण्यातच उद्योग आणले नाहीत तर राज्यातील इतरही शहरात औद्योगिकीकरणाची चक्रे गतीमान केली. कृषी हा तर पवारांचा आवडता प्रांत. देशातून जगाला धान्याची निर्यात झाली तीही पवार केंद्रीय कृषी मंत्री असताना. फळबागा, गटशेती हे नवे प्रयोगही त्यांनी राबवले. यशस्वी करुन दाखवले.
मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा प्रश्न, सतरा वर्षे मराठवाडा त्यामुळे धुमसत होता. सत्ता जाण्याची खात्री असतानाही शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी नामांतराचा निर्णय घेतला. महिलांना सत्तेत 33 टक्के आरक्षण दिले. त्यासोबतच संरक्षण मंत्री असताना महिलांना सैन्यदलात भरती करण्याचा निर्णय घेतला. हे फुले -शाहू -आंबेडकरांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणाऱ्या पवारांकडूनच शक्य झाले.
पवारांनी काय काय केले हे नव्वदीनंतरच्या पिढीला तेवढे माहित नाही. कारण ही जाहिरातीवर पोसलेली पिढी. या जुन्या जाणत्या नेत्यांना जाहिरातीचा सोस नव्हता. आयटीवर पोसलेल्या पिढीला ‘आयटी सेल’ने जे दाखवलं तेच सत्य आणि 2014 नंतरच देश स्वतंत्र झाल्यासारखे वाटायला लागले.
कोटावर गुलाब असलेले नेहरु, फाळणीवाले गांधी, आणि फक्त राज्यघटना लिहणारे, आरक्षण देणारेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर दाखवण्यात आले. पण या नेत्यांचे कर्तृत्व एवढे मोठे आहे की, देशाच्या कणाकणांत त्यांचे अस्तित्व आहे. तुम्ही – आम्ही आयुष्यभर त्यांच्या ऋणात राहावे एवढा त्यांचा त्याग व समर्पण आहे.
नेहरू, गांधी यांचा हाच वारसा यशवंतराव चव्हाणांनी चालवला आणि पुढे शरद पवार तो घेऊन निघाले आहेत. हे सगळं स्मृतीपटलावरुन धुसर होत चाललं होतं. तेव्हा गोपीचंद पडळकर तुम्ही पवारांबद्दल विखारी भाषा वापरुन फार चांगले केले. पवारांसह जाणत्या नेत्यांचे हे कर्तृत्व नव्या पिढीसमोर ठेवण्याला निमित्त मिळालं.