लय भारी न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस सत्तास्थापन करणार आहेत. त्यासाठी तिन्ही पक्षांमध्ये एकमत झालं आहे. किमान समान कार्यक्रमाच्या मसुद्याबाबत राज्यातील नेत्यांमध्येही एकमत झालं आहे. त्यानंतर हा मसुदा दिल्लीत हायकमांडकडे पाठवला जाणार आहे. अशी माहिती काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिली.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मसुद्याबाबत दिल्लीत शरद पवार आणि सोनिया गांधी अंतिम निर्णय घेणार आहेत. हायकमांड मसुद्यात काय बदल करायचे असेल त्या सूचना देतील. चर्चा करुन योग्य निर्णय घेऊ, असं वडेट्टीवारांनी सांगितलं. त्यामुळे सरकार बनवायला वेळ लागणार नाही, पण स्थिर सरकार हवं ही आमची भूमिका आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिका ही किमान समान कार्यक्रमाबाबत एकमत यासाठी आहे. ते एकमत झालं आहे.
दरम्यान, काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदाची भूमिका स्पष्ट होत असताना, तिकडे राष्ट्रवादीने यापूर्वीच आपली भूमिका जाहीर केली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असं जाहीर सांगितलं आहे. ‘सारखा-सारखा हा प्रश्न का विचारला जातो, की मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार का? मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना-भाजपमध्ये वाद झाला होता. त्यामुळे निश्चितच शिवसेनेचाच मुख्यमंत्री असणार. शिवसेनेला अपमानित करण्यात आलं होतं. त्यांचा स्वाभिमान कायम राखणं ही आमची जबाबदारी आहे’ असं नवाब मलिक ‘एएनआय’ वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले होते.