टीम लय भारी
मुंबई : महसूल विभागाचे पूर्णत: संगणकीकरण करणे, तहसिलपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतच्या इमारतींचे बांधकाम करणे, या कार्यालयांमध्ये येणाऱ्या सामान्य लोकांसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करणे अशा पद्धतीने महसूल विभागाचा पूर्णत: कायापालट करण्याचा चंग महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बांधला आहे. थोरात यांचा हा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी सरकारची तिजोरी मुक्तपणे खुली ठेवण्यास संमती दिली आहे.
अर्थसंकल्पाच्या तयारीच्या अनुषंगाने अजित पवार यांनी महसूल विभागाची नुकतीच बैठक घेतली होती. या बैठकीला बाळासाहेब थोरात यांच्यासह दोन्ही खात्यांचे वरिष्ठ अधिकारी हजर होते. मुद्रांक, गौण खनिज, जमीन महसूल इत्यादींच्या माध्यमातून महसूल विभाग राज्य सरकारला ३० ते ३२ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न देत असतो. परंतु महसूल विभागातील विविध कार्यालयांना अनेक समस्या भेडसावत आहेत. बदलत्या काळानुसार संगणकीकरण व आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सामान्य जनतेची कामे तात्काळ पूर्ण होतील. अनेक ठिकाणच्या जिल्हाधिकारी कार्यालयांचे बांधकाम अर्धवट अवस्थेत आहे, किंवा नवीन बांधकाम हाती घेण्याची गरज आहे. अनेक तहसिल, प्रांत कार्यालयांच्याही इमारतींची दयनीय स्थिती आहे. अशी कामे पूर्ण करण्यासाठी अंदाजे ३२५ कोटी रुपयांची गरज बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. त्यावर ‘महसूल विभाग राज्याला घसघशीत उत्पन्न देत असतो. त्यामुळे तुम्हाला निधी कमी पडू देणार नाही’ अशा शब्दांत अजितदादा पवार यांनी थोरातांनी टाकलेला शब्द पूर्ण करण्याची तयारी दाखविली.
प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासाठी आवश्यकतेनुसार ‘जिल्हा नियोजन समिती’च्या (डीपीडीसी) माध्यमातून किमान पाच कोटी रुपये उपलब्ध करू असे आश्वासनही अजितदादांनी दिले. इमारतीचे बांधकाम करताना नियोजन विभागाचे एक सूत्र आहे. हे सूत्र कोलदांडा बनले आहे. त्यामुळे बांधकामासाठी नवीन निधी मिळविण्यात अडचणी येतात. ही बाब बाळासाहेब थोरात यांनी अजितदादांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर हे सूत्र तात्काळ रद्द करण्याची सूचना अजितदादांनी नियोजन विभागाच्या अधिकाऱ्यांना केली.
थोरात – पवार यांच्या या बैठकीमुळे पुढील काळात तालुका, जिल्हा स्तरावरील कार्यालये देखण्या रूपात पाहायला मिळू शकतील असा आशावाद सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना व्यक्त केला.
हे सुद्धा वाचा
गाऱ्हाणे मांडणाऱ्या महिलांविषयी बाळासाहेब थोरातांनी दाखविली कणव, अधिकाऱ्यांना लावले कामाला
अजितदादांना भेटण्यासाठी तुडुंब गर्दी, मंत्रालयाबाहेरही लांबलचक रांगा