लय भारी न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘महाविकास आघाडी’तील सगळ्या पक्षांनी मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब झाले. ट्रायडंट हॉटेलमध्ये नाव निश्चितीचा देखणा सोहळा पार पडला. या सोहळ्यानंतर उद्धव ठाकरे तडक मातोश्रीवर पोचले, अन् बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाले.
महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा आणणार असे आपण बाळासाहेबांना वचन दिले असल्याचे उद्धव यांनी वारंवार सांगितले होते. निवडणुकांच्या जाहीर प्रचारसभांमधूनही उद्धव यांनी बाळासाहेबांना दिलेल्या या वचनाचा वारंवार उल्लेख केला होता. हे वचन पुर्णत्वास जात असताना उद्धव यांनी बाळासाहेबांना वंदन केले.
येत्या २८ नोव्हेंबर रोजी होणार शपथविधी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अन्य मंत्र्यांचा शपथविधी सोहळ्याची तारीख बदलण्यात आली आहे. १ डिसेंबरऐवजी आता २८ नोव्हेंबर रोजी शपथविधी होणार आहे. तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी आज राज्यपालांची भेट घेतली. त्या दरम्यान हा निर्णय घेण्यात आला. हा शपथविधी सोहळा २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता दादर येथील शिवाजी पार्कवर होईल. उद्धव ठाकरे यांच्या व्यतिरिक्त आणखी कोण मंत्री शपथ घेतील. याबाबत उद्या निर्णय होईल, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
बाळासाहेबांची आठवण येते
नाव निश्चितीच्या सोहळ्याप्रसंगी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, लोक मला विचारतात की, संघर्षाच्या काळात तुम्हाला बाळासाहेबांची आठवण येते का. खरेतर संघर्षानंतर विजय मिळतो तेव्हा मला बाळासाहेबांची आठवण येते. मला काही तरी व्हायचय हा विचार मी स्वप्नातही विचार केला नव्हता. आपल्या ताकदीचा वापर सामान्य लोकांसाठी केला पाहीजे ही आमच्या घराची परंपरा आहे. आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून ही परंपरा आहे. आज २६ नोव्हेंबरमुळे २६ / ११ हल्ल्यातील त्या विरांची आठवण येते. त्याच बरोबर शिवसेनेसाठी झिजलेले अनेक सेना नेते, शिवसैनिक यांचीही आठवण येते. या सगळ्यांना नम्रपणे अभिवादन करतो.
मित्रांनी फसवले, पण विरोधकांनी माझ्यावर विश्वास ठेवला
उद्धव ठाकरे म्हणाले की, सोनिया गांधी यांचे मी आभार मानतो. तीन टोकांचे तीन विचार असलेले पक्ष एकत्र येत आहोत. समाजवादी पक्ष सुद्धा सोबत आहे. गेल्या ३० वर्षांसोबत आम्ही भाजपशी मैत्री केली. पण त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला नाही. पण ज्यांच्याशी आम्ही सामना केला त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. मी कमावले काय आणि गमावले काय याचा विचार करायला हवा. मी आखाड्यात पहिल्यांदा येत असलो तरी आम्ही मैदानातील माणसे आहोत. मैदान मारलेल्या लोकांना आखाडा अवघड जात नाही.
नव्या सरकारच्या मंत्रीमंडळ अनुभव व्यक्ती असतील. एवढी अनुभवी लोकं यापूर्वीच्या कोणत्याही सरकारमध्ये नव्हती. आपण तिघेही हमरीतुमरी करणार नाही. आपले सरकार आहे. सामान्य जनतेला वाटले पाहीजे हे माझे सरकार आहे. मुख्यमंत्र्यांच्या खूर्चीला अनेक खिळे असतात. जाणारा मुख्यमंत्री आणखी खिळे ठोकत असतो. पण आमच्या तिघांकडे मोठा हातोडा आहे. आम्ही हे सगळे खिळे ठोकून काढू.
मोठ्या भावाला दिल्लीत भेटायला जाईन
मी मोठ्या भावाला दिल्लीत भेटायला जाईन असे सांगत त्यांनी नरेंद्र मोदी यांना टोला हाणला. देवेंद्र फडणवीस यांचे आजचे वाक्य डसले. मी सोनिया गांधींची लाचारी केली. मी मातोश्रीच्या बाहेर गेलो, अशी टीका फडणवीस यांनी माझ्यावर केली. पण मी त्यांना सांगू इच्छितो की, खोटेपणा माझ्या हिंदुत्वात नाही. बाळासाहेब म्हणायचे, दिलेला शब्द पाळा. पण भाजपने दिलेला शब्द पाळला नाही. भाजपने शिवसेनेत फोडाफोडी केली. गरज पडली की शिवसेनेला जवळ करायचे, गरज संपली की शिवसेनेला दूर करायचे. हे बिल्कूल चालणार नाही. ते पुढे म्हणाले की, मी मोजक्या वेळाच विधानसभेत आलो असेन. त्यामुळे संपूर्ण मंत्रीमंडळाच्या पाठिंब्याची मला गरज आहे. शरद पवारांचा आशिर्वाद आणि अनुभवाचाही मला फायदा होईल. अवकाळी पावसांमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसायचे आहेत. आपल्या सगळ्यांच्या साथीने मी ही जबाबदारी स्विकारत आहे. बाळासाहेबांनी सुप्रिया सुळेंना खासदार बनविण्यासाठी मदत केली होती. आज पवार साहेबांनी मला मदत केली. याला म्हणतात मैत्री. ही खरी लोकशाही. माझे सरकार कुणाशीही सूडबुद्धीने वागणार नाही. शिवरायांचा महाराष्ट्र नव्याने सांगण्याची गरज नाही, असेही उद्धव म्हणाले.
हे सुद्धा वाचा
मोठी बातमी : शरद पवारांच्या भेटीला अजित पवार
शरद पवार म्हणाले, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावर पाहायला बाळासाहेब ठाकरे हवे होते