टीम लय भारी
मुंबई :- महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यावरुनही राज्यात जोरदार राजकारण रंगल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिकमधल्या दुर्घटनेमुळे ऑक्सिजनच्या तुटवड्याचे गांभीर्य अधिक प्रकर्षाने जाणवू लागलेले असताना आता या मुद्द्यावरून केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार आणि महाराष्ट्रात सत्ताधारी विरुद्ध भाजपा यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत.
राज्यातल्या ऑक्सिजन तुटवड्यावरून भाजपाकडून टीका आणि आक्षेप घेतले जात असताना आता सत्ताधाऱ्यांकडून देखील राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भूमिका मांडली आहे. “ऑक्सिजनचा आपल्याकडे तुटवडा असताना बांगलादेशला ऑक्सिजन द्यायची काय गरज होती?” असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून आता राज्यात राजकारण रंगताना दिसू लागले आहे.
संतप्त न्यायालयाने “भीक मागा,चोरी करा पण ऑक्सिजन द्या” दिल्ली उच्च न्यायालयाने मोदी सरकारला सुनावले
ज्या प्राणवायू ने संपूर्ण जीवसृष्टी जिवंत आहे त्या प्राणवायूची सध्या कित्येक रुग्णांना आत्यंतिक गरज आहे आणि केंद्र सरकार त्याचा पुरवठा करत नाहीये…#संवेदनाहीन— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 22, 2021
“पंतप्रधान बंगालमध्ये बिझी”
ऑक्सिजनबाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील जितेंद्र आव्हाडांनी यावेळी निशाणा साधला. “राज्यातल्या मुद्द्यांवर केंद्राशी बोललो, तर पंतप्रधान बंगालच्या निवडणुकांमध्ये बिझी असल्याचे सांगण्यात आले. पीपीई किट, व्हेंटिलेटर देखील केंद्राने महाराष्ट्राला कमी दिले. ऑक्सिजनचा देखील कमी पुरवठा केला जात आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने ऑक्सिजनच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला सुनावले आहे”, असे जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.