लय भारी न्यूज नेटवर्क
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पुन्हा परत यावं, यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी साद घातली आहे. ‘सुबह का भुला अगर शाम को घर आ जायें तो उसे भुला नही कहते’, असं म्हणत छगन भुजबळ यांनी अजितदादांना परत येण्याचं आवाहन केलं. या उत्साहाच्या क्षणामध्ये राष्ट्रवादीत काहीतरी चुकल्यासारखं दिसत आहे, त्यामुळे अजितदादांची ही आघाडी मजबूत करण्यासाठी गरज आहे, असंही भुजबळ म्हणाले.
ट्रायडेंट हॉटेलमध्ये महाराष्ट्र विकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांचं नावही मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर करण्यात आलं. यावेळी बोलताना भुजबळांनी अजितदादांना परत येण्याचं आवाहन केलं.
अजितदादा नसल्यामुळे आमच्याकडे संख्याबळ नाही असं सांगत फडणवीसांनी राजीनामा दिला. झालं गेलं विसरुन अजित पवारांचं स्वागत करु, त्यासाठी शरद पवार यांना आग्रहाची विनंती करतो. कारण, आघाडी मजबूत करण्यासाठी अजितदादांची आपल्याला गरज आहे,’ असंही भुजबळम्हणाले.