टीम लय भारी
सांगली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनम्रतेचे अनोखे दर्शन घडविले. ‘प्रोटोकॉल’ बाजूला ठेवून त्यांनी एका तालुका तहसिदाराला खूर्चीत बसविले. स्वतः उभे राहिले, अन् छानसा फोटो काढू दिला. उद्धव ठाकरे यांचा हा विनम्रपणा अधिकारी वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. सामान्य जनतेमधूनही ठाकरे यांचे कौतुक केले जात आहे.
सरकारी यंत्रणेमध्ये ‘प्रोटोकॉल’चा नको तेवढा बागुलबूवा उभा केला जातो. तहसिलदारांकडे आमदार जरी आले तरी आपली त्यांच्यासमोर मान खाली घालून उभे राहावे लागते. ताठ मान दाखविली तर आमदार साहेबांनी आपला इंगा दाखवलाच म्हणून समजा. मग खासदार, सभापती, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, मंत्रालयातील सचिव आणि मंत्री असे उच्चपदस्थ असतील तर तहसिलदार बिचारा ‘प्रोटोकॉल’ पाळताना घायकुतीला येतो. वरिष्ठ आल्यानंतर आपण त्यांना आपली खूर्ची द्यायची. त्यांच्या समोर वाकून उभे राहायचे. त्यांच्या दौऱ्याची सगळी सरबराई करायची. निवास, वाहन आणि भोजन याची सगळी व्यवस्था करायची याची सवय तहसिलदार किंवा संबंधित अधिकाऱ्यांना झालेली असते. वरिष्ठांकडून कौतुकाची दोन शब्द ऐकायला मिळणे हे सुद्धा दुरापास्त असते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या समोर आपल्याला खूर्चीत बसायचा मान मिळेल याची कल्पनाही कोणतेच तहसिलदार करू शकणार नाहीत. मात्र इस्लामपूर येथील तहसिलदार रवींद्र सबणीस यांना खूर्चीत बसवून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा मोठेपणा दाखवला.
यापूर्वी कोणत्याही मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांनी इतकी विनयता दाखविली नसेल. बरेच मंत्री जनतेसोबत विनम्रता दाखवतात. पण उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांनाही मानाचे स्थान दिले आहे. एका तालुका स्तरावरील अधिकाऱ्याला एवढा मोठा सन्मान दिल्याने अधिकारी वर्तुळातही आता ठाकरे यांच्याविषयी आदराची भावना निर्माण झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
तहसिल कार्यालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन झाल्यानंतर आम्ही मान्यवरांसोबत दालनाकडे गेलो. वाटेतच मुख्यमंत्री म्हणाले, तुम्हालाच खूर्चीत बसवतो. मी विनम्रपणे पुन्हा पुन्हा नकार दिला. खूर्चीजवळ गेल्यानंतरही मी नकारच देत होतो. कारण ते राजशिष्टाचारामध्ये बसत नव्हते. आपण उद्घाटक आहात. त्यामुळे तुम्ही खूर्चीत बसलात तर तो आमचा बहुमान असेल अशी मी त्यांना विनंती केली. मग मुख्यमंत्री स्वतः खूर्चीत बसले. त्यानंतर पुन्हा मला खूर्चीत बसायची सुचना केली. त्यांच्यासोबत जयंत पाटील, हसन मुश्रीफ, बाळासाहेब पाटील, सतेज पाटील, शंभूराज देसाई आणि विश्वजीत कदम असे सहा मंत्री होते. आमचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी सुद्धा होते. त्यामुळे माझी पंचाईत झाली. पण मुख्यमंत्र्यांच्या आग्रहामुळे मी खूर्चीत बसलो. माझ्यासाठी हा आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे. मला तुमच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी मला सांगितले.
रवींद्र सबणीस, तहसिलदार, इस्लामपूर, सांगली
इस्लामपूर तहसिल कार्यालयाचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते शुक्रवारी उद्घाटन झाले. त्यावेळी हा प्रसंग सगळ्यांना पाहायला मिळाला.
‘तळागाळात काम करणाऱ्या अधिकाऱ्याला प्रोटोकाल बाजूला ठेवून असा सन्मान दिल्याचा प्रकार दुर्मिळातील दुर्मिळ आहे. त्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांना सलाम करतो’ अशी प्रतिक्रिया एका अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे
शरद पवारांच्या सल्ल्याचे ठाकरे यांच्याकडून पालन
अधिकाऱ्यांना विश्वासात घेतले, त्यांना प्रोत्साहन दिले तर ते उत्तम कामगिरी करतात. अधिकाऱ्यांना सोबतीला घेऊन विकासाची कामे पूर्ण करणे सोपे असते, असा सल्ला शरद पवार सगळ्याच मंत्र्यांना देत असतात. उद्धव ठाकरे यांनी या सल्ल्याचेच पालन केले असावे असे त्यांच्या कृतीतून दिसत आहे.
हे सुद्धा वाचा
उपजिल्हाधिकारी बनलेल्या धावपटू ललिता बाबरने शेतात घेतला ऊसाचा आस्वाद, शेतकऱ्यांशीही साधला संवाद
VIDEO : बेरोजगार युवक, महिलांसाठी मधमाशीपालन उद्योग, सरकार देणार अनुदान
VIDEO : शाळकरी मुलांना अभियांत्रिकीची तोंड ओळख; राज्य सरकारचा ‘लय भारी’ उपक्रम !
आयएएस अधिकाऱ्याने बनविलेल्या देखण्या गावाचे ९५ अधिकाऱ्यांनी घेतले दर्शन
आयएएस अधिकाऱ्याच्या पत्नीच्या एका फोनवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी वाचविले तरूणाचे प्राण