मुंबई: नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळं या जागेसाठी पुन्हा निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष पुन्हा सक्रिय झाला असून ‘आम्ही फासे पलटवणार’ असं सूचक वक्तव्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. फडणवीस यांच्या त्या वक्तव्यावर शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. विधानसभा अध्यक्षपदावरून फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याकडं पत्रकारांनी राऊत यांचं लक्ष वेधलं. त्यावर, ‘फडणवीसांना त्यासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत,’ असं राऊत म्हणाले.
‘सामना’च्या आजच्या अग्रलेखात काँग्रेसमधील फेरबदलाचे विश्लेषण करताना शिवसेनेनं बाळासाहेब थोरात यांचं कौतुक केलं आहे. तसंच, नाना पटोले हे भाजपमध्ये जाऊन आले आहेत याकडंही लक्ष वेधलं आहे. ही टीका आहे का असं विचारलं असता राऊत यांनी नकारार्थी उत्तर दिलं.
‘नानांवर टीका केलेली नाही. त्यांचं कौतुकच केलंय. प्रश्न काँग्रेसला नवसंजीवनी मिळण्याचा आहे. नानांचा उत्साह महत्त्वाचा आहे. नाना हे एक झुंजार नेते आहेत. पक्षाला ऊर्जा देण्याचं काम त्यांनी करावं,’ असं संजय राऊत म्हणाले.
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घ्यावी लागणार असल्यानं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नाराज आहेत का, यावर प्रश्नावर राऊत यांनी सावध उत्तर दिलं. ‘घटनात्मक पदावरच्या निवडणुका वारंवार होऊ नयेत, अशी आमची भूमिका आहे.
अध्यक्षपद पाच वर्षांसाठी असतं. मध्येच राजीनामा दिल्यास पुन्हा निवडणूक घ्यावी लागते. सभागृहात महाविकास आघाडीचं बहुमत आहे पण तरीही अशा गोष्टी टाळायला हव्यात,’ असंही राऊत म्हणाले.