लय भारी न्यूज नेटवर्क
मुंबई : शिवसेनेसोबत सरकार बनविण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीची आज बैठक होईल अशी शक्यता होती. परंतु ही बैठक आता उद्या (बुधवारी) होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी ही माहिती दिली.
इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते व्यस्त आहेत. त्यामुळे नवी दिल्ली येथे होणारी आजची बैठक पुढे ढकलली असल्याचे मलिक म्हणाले. या बैठकीत दोन्ही पक्षांचे दिल्लीतील व राज्यातील नेते सहभागी होतील असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, या बैठकीकडे देशातील संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार बनणार किंवा नाही याबाबतच्या निर्णयाचे बऱ्याच दिवसांपासून घोंगडे भिजत पडले आहे. अशातच शरद पवार यांनी ‘सरकार स्थापनेबाबत शिवसेना व भाजपला विचारा’ असे वक्तव्य केले होते. त्यामुळे सत्ता स्थापनेचा तिढा लवकरच सुटणार कि तो आणखी गुंतागुंतीचा होणार याची चिंता महाराष्ट्रातील जनतेला लागली आहे.
सोनिया गांधींसोबत चर्चा
दरम्यान, राज्यातील सत्ता स्थापनेबाबत सोनिया गांधी व काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांची आज चर्चा झाली. यांत अहमद पटेल, ए. के. अँटोनी, मल्लिकार्जून खर्गे आदी नेत्यांचा समावेश होता.
हे सुद्धा वाचा
शरद पवार समजून घेण्यासाठी भाजपला १०० जन्म लागतील : संजय राऊत