लय भारी न्यूज नेटवर्क
मुंबई: एकिकडे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार असे चित्र निर्माण झाले होते. मात्र शुक्रवारची रात्र महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी देणारी ठरली. महाराष्ट्र गाढ झोपेत असताना शनिवारची उगवलेली सकाळ देशात मोठा राजकीय भूकंप घडवणारी ठरली. राज्यात भाजप राष्ट्रवादी युतीचे सरकार बनवण्याच्या प्रक्रियेतील पहिला टप्पा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधीने पार पाडला गेल्याची बातमी समोर आली अन अनेकांची झोप उडाली. दरम्यान, अजित पवार यांच्या या खेळीचे सोशल मीडियावर जोरदारपणे तोफा डागल्या जाऊ लागल्या आहेत.
सकाळी आठ वाजता राजभवनात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचा शपथविधी पार पडला. या बातमीने राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले. मागील पाच वर्षांत राष्ट्रवादी विरूध्द भाजप हा संघर्ष अतिशय तीव्र झालेला महाराष्ट्राने पाहिला. या संघर्षात राष्ट्रवादीला संपवण्यासाठी भाजपाने जे जे करता येईल ते ते केले. त्यातच निवडणूक झाली. निकाल आले. राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारली. दरम्यान राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होणार असे संख्याबळ असतानाच सेनेने मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकला. त्यातून युती तुटली. शिवसेना +राष्ट्रवादी + काँग्रेस यांच्या आघाडीतून राज्यात नवीन सरकार बनणार असेच चित्र महिनाभरापासून रंगलेले होते. त्यानुसार सर्व प्रक्रिया घडत होत्या. येत्या दोन दिवसांत महाविकास आघाडीचे सरकार बनणार असे स्पष्ट झाले होते. तोच अचानक भाजपा सोबत अजित पवारांनी हातमिळवणी करत शनिवारी घाईघाईत शपथविधी उरकून घेत सर्वांनाच दे धक्का दिला.
अजित पवारांचाही निषेध करताना काही नेटिझन्स दिसत आहेत. फुरोगाम्यांनो आता कसं वाटतयं अशाही पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदारपणे फिरू लागल्या आहेत. त्याचबरोबर भाजपाकडून याला म्हणतात सर्जिकल स्ट्राईक अशा पोस्ट फिरवल्या जाऊ लागल्या आहेत. दरम्यान राष्ट्रवादीने केली 2014 ची कृतीशील अंमलबजावणी असेही काही नेटिझन्स म्हणून लागले आहेत. जे पावसानं कमावलं ते एका शपथविधीनं गमावलं असही काही नेटीझन्स म्हणत आहेत. राष्ट्रवादीच्या विश्वासहर्तेवर अनेक जण टीका करताना दिसत आहेत. सोशल मिडीयावर राष्ट्रवादीविरोधात उसळलेली संतापाची लाट पाहता राष्ट्रवादी काय भूमिका घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हे सुद्धा वाचा
राजभवनात रात्री पाप चालतात : संजय राऊत
अजित पवारांनी शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला, रात्री 9 वाजल्यानंतर झाले होते गायब