टीम लय भारी
मुंबई :- कोरोनानंतर राज्याची अर्थव्यवस्था कोलमडली होती. परंतु कोलमडलेली अर्थव्यवस्था पुन्हा रूळावर आणण्यासाठी नाणार रिफायनरी सारखे प्रकल्प हे अत्यंत महत्वाचे आहेत. एवढी मोठी गुंतवणूक राज्याबाहेर जाता कामा नये, यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना रविवारी पत्र पाठविले होते.
मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले, नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत मी मांडलेली भूमिका अत्यंत योग्य असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः आपल्याला फोनवर सांगितले आहे. ते स्वतः कदाचित या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत, असा खुलासा राज ठाकरे यांनी सोमवारी नाणार येथील शिष्टमंडळासमोर केला. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी देखील नाणारबाबत आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.
नाणार प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असल्यानेच तेथून प्रकल्प हटविण्यात आला असून, त्या ठिकाणी रिफायनरी न करण्याचा निर्णय आधीच झालेला आहे. आम्हाला वाटते म्हणून एखाद्या उद्योगाला विरोध किंवा पाठिंबा देत नाही. यापूर्वी स्थानिकांचा विरोध असल्यामुळेच आम्ही तेथून प्रकल्प दुसरीकडे हलविण्याचा निर्णय घेतला होता. असे म्हणत आता कोणाला स्वागत करायचे असेल, तर ते करू शकतात, असा टोला देखील उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना लगावला. तसेच रिफायनरीला नाणारऐवजी दुसरी पर्यारी जागा देणार आहे. परंतु, हा प्रकल्प राज्याबाहेर जाऊ देणार नाही, अशी भूमिकाही उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे.
नाणार प्रकल्पाच्या बाजूने राज ठाकरे यांनी भूमिका जाहीर केल्यानंतर नाणार येथील रहिवाशांचे आणि समाजसेवी संस्थेच्या शिष्टमंडळाने सोमवारी कृष्णकुंज येथे राज ठाकरे यांची भेट घेतली होती. नोटबंदी ते कोरोना या सर्व घटनांमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार बुडाले आहेत. आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत नाणारसारखे प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जाता कामा नयेत. मात्र, अशा प्रकल्पातून तयार होणारा रोजगार स्थानिकांच्या आणि मराठी माणसांना मिळायला हवा. यासाठी सर्वांनी दक्ष राहणे आवश्यक असल्याचेही राज ठाकरे यांनी शिष्टमंडळाला सांगितले होते. कोकणात आपल्याला पर्यटनावरच आधारित रोजगारनिर्मिती करायला हवी आणि भविष्यात त्यावरच लक्ष केंद्रित करू. पण नोटबंदी ते कोरोना ह्याकाळात प्रचंड बेरोजगारी वाढली. अशा ह्या विदारक स्थितीत ग्रीन रिफायनरीसारखे प्रकल्प राज्याबाहेर जाऊ नयेत, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट होते.
“नाणारच्या प्रकल्पात आपल्या महाराष्ट्रातल्या मुला-मुलींना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळायला हवं नाहीतर आम्ही आहोतच.” – मनसे अध्यक्ष @RajThackeray #महाराष्ट्र_प्रथम pic.twitter.com/yauNawQddx
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) March 8, 2021
राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाबाबत घेतलेली भूमिका योग्य असून, आम्ही त्याचे स्वागत करतो. मला त्यांचे पत्र मिळाले आहे. त्यांची भूमिका अगदी योग्य आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. अनिल काकोडकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर सर्व शंका संपल्या आहेत. शिवाय, नाणार येथील प्रस्तावित प्रकल्प ही ग्रीन रिफायनरी आहे. नाणार प्रकल्पाचा निवडणुकीशी कोणताही संबंध नाही. शिवसेनेच्या काही नेत्यांना मोकळेपणाने बोलायची संधी दिली तर तेदेखील नाणार प्रकल्पाला पाठिंबा देतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले होते.