27 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्रमास्क न वापरणे हे धाडस कसले?; मुख्यमंत्र्याचा राज ठाकरेंना टोला

मास्क न वापरणे हे धाडस कसले?; मुख्यमंत्र्याचा राज ठाकरेंना टोला

टीम लय भारी

मुंबई :-  महाराष्ट्र राज्यात कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना रूग्णवाढीचा आकडा ४० हजारांच्या पुढे गेला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जनतेसोबत संवाद साधला आहे. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे. त्या आधी, विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांशी चर्चा केली जाणार आहे. त्याचबरोबर, मुख्यमंत्र्यांनी जनतेला सर्व प्रकारची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. मास्कच्या वापरावरून मुख्यमंत्र्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अप्रत्यक्ष टोला हाणला आहे.

कोरोना विषयक नियम काटेकोरपणे पाळले जात नसल्यामुळे संसर्ग वाढत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. करोनाची खिल्ली उडवणाऱ्या, लॉकडाउन विरोधात रस्त्यावर उतरण्याची भाषा करणाऱ्यांनाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सुनावले आहे. मास्क लावल्याशिवाय घराबाहेर पडू नका, असा सल्ला प्रशासनातर्फे दिला जात असतानाही अनेक जण विनामास्क फिरत असल्याचे चित्र आहे. खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मागील काही दिवसांत मास्क न घालता जाहीर कार्यक्रमांत सहभागी झाले होते. त्याबद्दल त्यांना विचारले असता मी मास्क वापरत नाही, असे ते म्हणाले. नाशिकच्या दौऱ्यात त्यांनी मास्क घालणाऱ्या माजी महापौरांना त्याबद्दल विचारणा केली होती. त्यांच्या या भूमिकेमुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते. राज ठाकरे यांच्यावर सरकार काय कारवाई करणार, असा प्रश्न लोकांमधून विचारला जाऊ लागला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी काल राज्याला संबोधित करताना नाव न घेता राज ठाकरे यांना जोरदार टोला हाणला.

‘अनेकांना असे वाटते की मास्क वगैरे काय लावायचा? मी मास्क वगैरे वापरत नाही असे काही लोक इतरांना सांगतात. पण मास्क न वापरण्यात शौर्य कसलं? मास्क वापरत नाहीस म्हणजे तू कोणी शूर आहेस का? मास्क लावण्यात लाज वाटण्यासारखे काय आहे?,’ असा खोचक टोला मुख्यमंत्र्यांनी हाणला आहे. ‘लसीकरण घेतल्यानंतरसुद्धा मास्क लावलाच पाहिजे,’ अशी तंबी ही मुख्यमंत्र्यांनी दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी