टीम लय भारी
मुंबई :- महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. राज्यातील कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिनी लॉकडाऊन सुरू केले आहे. परंतु या कोरोनाच्या संकटामुळे ठाकरे सरकारने नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेणार नाही, परीक्षेविना त्यांना उत्तीर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्याच्या शिक्षण विभागाने हा मोठा निर्णय घेतला आहे. या आधी ही परीक्षा ऑनलाईन घेण्यात यावी, अशा सूचना होत्या. परंतु त्यावर पुन्हा एकदा विचार करण्यात आला. आता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविनाच पास केले जाणार आहे, असा निर्णय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला आहे.
पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय
यापूर्वी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार आहेत. या परीक्षांच्या वेळापत्रकात थोडासा बदल करायचा की नाही, याबाबत येत्या एक – दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याचे ही शिक्षण विभागाने सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील पहिली ते आठवी विद्यार्थ्यांना सरसकट पास केले जाणार असल्याचे ही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले होते. या विद्यार्थ्यांची कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली जाणार नाही, असा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची महत्त्वाची घोषणा केली.
वर्षा गायकवाड नेमके काय म्हणाल्या होत्या?
राज्यात कोरोनाची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. पहिली ते आठवी वार्षिक मूल्यमापन याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या काळात आपण ऑनलाईन, ऑफलाईन, युट्यूब, गुगल यामाध्यमातून आपण शिक्षण सुरु ठेवले. खरतर पहिली ते चौथीच्या शाळा सुरु झाल्या नाहीत. तर पाचवी ते आठवी या शाळा सुरु झाल्या. पण काही ठिकाणी शाळा सुरु झाल्या त्या ठिकाणी अभ्यासक्रम पूर्ण झाले नाही. पण विविध माध्यमातून शिक्षण पोहोचावे असा प्रयत्न होता, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.
पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास करणार
पण सध्या कोरोनाची स्थिती पाहता पहिली ते आठवीचे विद्यार्थ्यांचे वर्षभराचे मूल्यमापन करणे गरजेचे आहे. त्यात या विद्यार्थ्याने कशाप्रकारे अभ्यास केला हे बघितले पाहिजे. पण आताची परिस्थिती बघता हे यावर्षी होणे शक्य नाही. राज्यातील जे पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास करुन त्यांना पुढच्या वर्गात पाठवण्यात येणार आहे, असा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.
१० वीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मेच्या दरम्यान होणार
नव्या वेळापत्रकानुसार १० वीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे च्या दरम्यान होणार आहे, तर १२ वीची लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे रोजी होणार असल्याचे राज्याच्या शिक्षण बोर्डाने सांगितले आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत १० वी आणि १२ वीच्या परीक्षा घेण्यात येतात.