टीम लय भारी
लातूर : बाजार समित्यांचे संचालक मंडळ निवडण्याचे अधिकार शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय भाजप सरकारने घेतला होता. हा निर्णय चांगला होता. पण आताच्या सरकारने केवळ सूडबुद्धीने हा निर्णय बदलला आहे. हा नवा निर्णय आंधळेपणाने घेतला आहे. सरकार असे वागायला लागले तर कृषी खाते कोलमडून पडेल, असा संताप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे.
राजू शेट्टी म्हणाले की, बाजार समित्या या राजकारणाच्या अड्डा बनल्या आहेत, याच्या तक्रारी आम्ही अनेक वर्षांपासून करीत आहोत. ज्या मोठ्या बाजार समित्या आहेत, तिथे शेतकऱ्याला काहीही अधिकार नाहीत. तिथे शेतकऱ्यांना विचारले जात नाही. त्या राजकारणाच्या अड्डे बनल्या आहेत. या बाजार समित्यांचे संचालक मंडळ निवडण्याचा अधिकार शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय आधीच्या सरकारने घेतला होता. हा निर्णय चांगला होता. आम्ही त्या सरकारच्या विरोधात होतो. पण या निर्णयाचे आम्ही स्वागत केले होते. आजही तो निर्णय बदलण्याची आवश्यकता नव्हती, असे माझे स्पष्ट मत आहे. निवडणुकीचा खर्च जादा येतो असे कारण या सरकारने दाखविले आहे. ग्रामपंचायत किंवा सोसायटीच्या निवडणुकीमध्ये किती खर्च येतो आणि बाजार समित्या निवडणुकीमध्ये किती खर्च येतो हे सुद्धा सरकारने दाखवावे. निवडणुकीचा खर्च वाढतो म्हणून बाजार समित्या राजकाकरण्यांच्याच घशात घालायच्या असतील, शेतकऱ्यांना तिथे आवाज ठेवणार नसाल तर निश्चितच सरकार चुकीच्या दिशेने चालले आहे, असे म्हणावे लागेल. आम्ही ते मान्य करणार नाही. मुळात बाजार समित्यांमध्ये भ्रष्टाचार होतो, व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट होते, फसवणूक होते यावर सरकारने काय केले ? केवळ आधीच्या सरकारने निर्णय घेतला म्हणून तो बदलणे आंधळेपणाचे लक्षण ठरेल. अशा पद्धतीने सूड बुद्धीने वागायला लागला तर महाराष्ट्राचे कृषी खाते कोलमडून पडेल, असे ते म्हणाले.
हे सुद्धा वाचा
शेतकऱ्यांना अडचणी मांडण्यासाठी प्रत्येक तालुक्यात कक्ष, आलिबागमध्ये झाली सुरूवात
Exclusive : ‘Link’ मध्ये स्पेस पडली अन् सहकार आयुक्तांचे निलंबन झाले
VIDEO : राजू शेट्टी यांचा सदाभाऊंवर वार, ‘महाविकास आघाडी’ सरकारलाही दिले आव्हान