टीम लय भारी
मुंबई : ‘कोरोना’च्या सावटामुळे मंत्रालयात ( Mantralaya ) स्मशान शांतता पसरली आहे. कर्मचारी मंत्रालयाकडे फिरकतच नाहीत. त्यामुळे महत्वाची कामे करण्यासाठीही मंत्रालयातील अनेक खात्यांमध्ये कर्मचारी नाहीत. त्यामुळे गैरहजर राहिलेल्या कर्मचाऱ्यांना अनेक खात्यांमार्फत नोटीसा काढल्या आहेत.
मंत्रालयातील ( Mantralaya ) प्रत्येक खात्यात विविध उपसचिव, अवर सचिव, कक्ष अधिकारी, सहायक, लिपीक असे अधिकारी व कर्मचारी कार्यरत असतात. या कर्मचाऱ्यांशिवाय संबंधित खात्यातील दैनंदिन कामे पूर्ण होऊ शकत नाहीत. महत्वाच्या फायली या अधिकारी – कर्मचाऱ्यांकडे असतात. शिवाय पत्रव्यवहार, परिपत्रके, आदेश निर्गमीत करण्यासाठी सुद्धा हा कर्मचारी वर्ग महत्वाचा असतो.
‘कोरोना’च्या सावटामुळे गेल्या महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टप्प्याटप्प्यात ‘लॉकडाऊन’ जाहीर केला. सुरूवातीला सरकारी कार्यालयांमध्ये ५० टक्के कर्मचाऱ्यांवरच काम करण्याचा निर्णय घेतला. नंतर कर्मचाऱ्यांचे हे प्रमाण ५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले.
सरकारच्या या निर्णयामुळे मंत्रालयातील ( Mantralaya ) अनेक अधिकारी – कर्मचाऱ्यांनी कामावर येणे बंद केले. काहीजण गावी निघून गेले. ‘कोरोना’च्या भीतीने सामान्य लोकांप्रमाणे मंत्रालयातील ( Mantralaya ) कर्मचाऱ्यांचीही पाचावर धारण बसली. त्यामुळे मुंबईत असूनही अनेकजणांनी घरी राहणेच पसंत केले.
अधिकारी – कर्मचारीच नसल्याने विविध खात्यांना त्यांची अत्यंत तातडीची कामे करता येईनात अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे मंत्रालयातील ( Mantralaya ) विविध विभागांनी आपल्या कर्मचाऱ्यांना नोटीसा काढल्या आहेत. परवानगी न घेता कामावर येत नसल्याचा ठपका या कर्मचाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. तर आलटून पालटून पद्धतीनुसार कामावर येण्याबाबतचेही आदेश काही खात्यांनी दिले असल्याची माहिती सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना दिली.
हे सुद्धा वाचा