टीम लय भारी
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा (Coronavirus) प्रकोप वाढत चालला आहे. नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली असून सर्व स्तरातून खबरदारी घेतली जात आहे. औरंगाबादमध्ये विनापरवाना गावात घुसल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे सीईओ मंगशे गोंदवले यांनी दिले आहेत.
गावागावातला कोरोना रोखण्यासाठी औरंगाबाद जिल्हा परिषदेने हे कडक पाऊल उचलले आहे. पास किंवा परवानगी घेऊनच गावात प्रवेश दिला जाणार आहे. विनापरवाना गावात घुसल्यास पोलीस ठाण्याची हवा खावी लागणार आहे.
सरपंच, ग्रामसेवक आणि पोलीस पाटलांवर गुन्हे दाखल करण्याची जबाबदारी दिली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे प्रशासनाने कडक पाऊले उचलली आहेत.
पोलीस यंत्रणा, डॉक्टर्स, अत्यावश्यक सेवेतील सर्व यंत्रणा कोरोनाच्या मुकाबल्यासाठी लढत आहे. सरकारी पातळीवर कोरोनाला रोखण्यासाठी सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे तरी सुध्दा रुग्ण संख्यावाढत चालली आहे त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने कडक पाऊले उचलली आहेत.