29 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रबारा बलुतेदारांचे कल्याण होऊ दे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घातले खंडेरायाला साकडे

बारा बलुतेदारांचे कल्याण होऊ दे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घातले खंडेरायाला साकडे

राज्यातील शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांवर शिवसेना उद्धव ठाकरे गट ‘५० खोके, एकदम ओके’ असा आरोप करायला लागले आहेत. त्याने सरकारची प्रतिमा दिवसेंदिवस अधिकच मलीन होत चालली आहे. म्हणूनच की काय थेट जनतेत जावून त्यांच्या मनात सरकारविषयी आपुलकीची भावना निर्माण करण्यासाठी शिंदे सरकारने ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम राज्यभरात सुरू केला आहे. सोमवारी जेजूरी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुफान बॅटिंग केली. ‘सरकार जोरदारपणे काम करीत आहे. मात्र, धडाडीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे आमची सत्तेची गाडी सुसाट सुटली आहे. राज्यातल्या जनतेच्या कल्याणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आजच्या जेजुरीतील कार्यक्रमात आम्ही खंडेरायाचा भंडारा उधळत राज्यातल्या बारा बलुतेदारांचे कल्याण होऊ दे,’ असे साकडे घातले आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी खंडोबाचे दर्शनही घेतले.

यावेळी फडणवीस म्हणाले, विठोबा आणि खंडोबाला मागणी केली की पूर्ण होते. जेजुरीत सर्व सेवा सुविधा मिळाव्यात यासाठी काम करणार असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. आता लोकांनी चकरा मारायच्या नाहीत. आता शासन थेट लोकांपर्यंत जात आहे. आपण एका-एका जिल्ह्यात एक हजार कोटी रुपयांपर्यंतची कामे केली आहेत. येत्या तीन वर्षात शेतकऱ्यांना सोलरवर वीज देणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बारा तास वीज मिळेल, असेही फडणवीस यांनी सांगितले. महिलांना आपण एसटीमध्ये अर्ध्या पैशात तिकीट केले आहे. शिक्षक सेवक आणि अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आवास योजनेच्या माध्यमातून पाच लाख घरे देणार आहोत. केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत, त्या माध्यमातून रोजगार मिळणार आहे. पुण्याच्या रिंगरोडचे काम सुरु आहे. सिंचनाच्या योजना सुरु आहेत. अजितदादा त्याबाबत बोलले आहेत. मी शब्द देतो, पुण्यातील सगळ्या पाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळेल, असेही फडणवीसांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा 
राहुल गांधी यांचे संसदेत आगमन; विरोधकांमध्ये संचारला उत्साह
भाजपाने थाळ्या वाजवून देशात दारिद्र्य आणले- नाना पटोले यांची सरकारवर टीका
भरबाजारात कुऱ्हाडीचे घाव घालून पत्नीची हत्या; पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करायचे आहे. पुरुषांना पैसे दिले की ६० ते ७० टक्केच परत येतात. पण महिलांना पैसे दिले की १०० टक्के पैसे परत येतात. त्यामुळे महिलांसाठी विविध योजना आणल्या आहेत. महिलांना आता जास्त पैसे द्यायचे आहेत. मुलगी जन्माला आली की ते कुटुंब लखपती होणार आहे. मोदी आवास योजनेच्या माध्यमातून कुणीही बेघर राहणार नाही. सगळ्या योजना शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचवल्या जात आहेत. मोठ्या महापालिकामध्ये सांडपाणी प्रकिया करून पाणी वापरता येईल, का त्या बाबतीतही काम सुरु आहे. असेही फडणवीस यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी