महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असतानाच केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. घरगुती गॅस सिलेंडरचे भाव गगनाला पोहोचलेले असतानाच नागरिकांना दिलासा म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाने एलपीजी घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती तब्बल २०० रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे, महागाईच्या ओझाने आधीच पिचून गेलेल्या सर्वसामान्य वर्गाला थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर बुधवारपासून सिलेंडरची किंमत साधारणपणे ९०० रुपयांच्या आसपास होईल. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी याबाबतची माहिती दिली.
याबाबत माहिती देताना मंत्री अनुराग सिंह ठाकूर म्हणाले की, “हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील महिलांना ओणम आणि रक्षाबंधनाची भेट म्हणून दिला आहे.”
“पंतप्रधान मोदी यांनी सर्व वापरकर्त्यांसाठी घरगुती एल पी जी सिलिंडरच्या किमतीत २०० रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे… रक्षाबंधनाच्या निमित्ताने देशातील महिलांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेली ही भेट आहे,” असे ते म्हणाले.
हे ही वाचा
जयंत पाटील यांनी सरकारची केली कानउघाडणी!
आदित्य ठाकरे महापालिकेवर प्रचंड संतापले
मंत्री गिरीष महाजनांच्या बंगल्यावर सामान्य लोकांनाही मिळते पोटभर जेवण !
मध्य प्रदेश राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने एलपीजी सिलिंडर स्वस्त दरात देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यातच केंद्र सरकारने मंगळवारी घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत प्रति सिलेंडर २०० रुपयांची कपात करण्याची घोषणा केली. साधारणपणे १४.२ किलोग्राम वजन असणाऱ्या सिलेंडरची किंमत साधारणपणे १,१०० रुपयांच्या आसपास आहे. परंतु केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर बुधवारपासून सिलेंडरची किंमत ९०० रुपयांच्या आसपास होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत केंद्र सरकारने ‘पंतप्रधान उज्वला योजना’ च्या अंतर्गत आणखी ७५ लाख उज्ज्वला गॅस लाभार्थी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या योजनेचे ९.६ कोटी लाभार्थी आहेत. अतिरिक्त उज्वला कनेक्शन नंतर लाभार्थींची संख्या १०.३५ कोटी होईल. उज्ज्वला लाभार्थ्यांसाठी, २०० रुपये प्रति सिलेंडर सबसिडी चालू ठेवल्यानंतर सिलेंडरची किंमत ७०३ रुपये असेल. या निर्णयाची घोषणा करताना माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, हे पाऊल घरांना दिलासा देण्याच्या उद्देशाने आहे.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर पुढे म्हणाले की, “सध्याच्या सरकारने महिलांच्या विकासासाठी पक्की घरे, शौचालये, अतिरिक्त अन्नधान्य आणि कोविड महामारीच्या काळात थेट लाभ हस्तांतरण यासह अनेक योजना सुरू केल्या आहेत.”
केंद्र सरकारच्या या निर्णयाने सामान्य वर्ग तसेच महिला वर्गाला थोडा दिलासा मिळणार असून भाज्या, तेल, डाळ यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंवरील किमतींवर सरकार काही निर्णय घेणार का यावर सर्वसामान्यांचे लक्ष लागून राहिले आहे.