28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयदेवेंद्र फडणवीसच सुपर सीएम, एकनाथ शिंदे फक्त चेहरा; नाना पटोलेंची मिश्किल टीका

देवेंद्र फडणवीसच सुपर सीएम, एकनाथ शिंदे फक्त चेहरा; नाना पटोलेंची मिश्किल टीका

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या संयुक्त सरकारवर जोरदार घणाघात करत देवेंद्र फडवणीस हे राज्याचे मुख्यमंत्री असून एकनाथ शिंदे हे फक्त मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आहेत अशी कोपरखळीही मारली आहे.

दादर येथील टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, “राज्यातील सरकारमध्ये अंतर्विरोध आहे हे स्पष्ट झाले आहे. एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांच्यात अधिकारपदावरून स्पर्धा सुरु आहे. अजित पवार यांच्या दादागिरीचा अनुभव मविआ सरकारने पाहिला आहे पण सध्या त्यांच्या दादागिरीला चाप लावला आहे. राज्यातील सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केवळ चेहरा आहेत आणि खरे मुख्यमंत्री ‘सुपर सीएम’ हे देवेंद्र फडणवीसच आहेत.”

“राज्यातील तिघाडी सरकारमध्ये मलईसाठी भांडणे सुरु आहेत, राज्यात दुष्काळाची स्थिती आहे, पिण्याचे पाणी नाही, चारा नाही, त्याकडे सरकारचे लक्ष नाही आणि तिन्ही पक्षात खुर्चीच्या वर्चस्वाची लढाई सुरु आहे. दोन दिवसापूर्वी मंत्रालयात शेतकऱ्यांनी जीवावर उदार होऊन आंदोलन करत सरकारकडे न्याय मागण्याचा प्रयत्न केला पण या सरकारकडून न्यायाची अपेक्षा नाही. सरकार स्थापन होऊन दिड वर्ष होत आहे पण अजून १७ जिल्ह्यांना पालकमंत्री नाहीत, मंत्रिमंडळाचा विस्तार करु शकत नाहीत. महाराष्ट्र झपाट्याने पिछाडीवर जात असताना सरकारमधील मंत्री मात्र खोटे आकडे दाखवत जनतेची फसवणूक करत आहेत, असा घणाघात नाना पटोले यांनी केला आहे.

हे ही वाचा 

आम्हाला जीव द्यावा लागला तरी बेहत्तर; मुंबईसाठी जितेंद्र आव्हाड यांचा दिल्लीश्वरांना इशारा

‘मुंबई महाराष्ट्रापासून तुटणार का ?’ याच मुद्द्यावरून निवडणुकीत समोर या, भाजपचे उद्धव ठाकरेंना आव्हान

प्रकाश आंबेडकरांचा ‘इंडिया’त समावेश होणार का ?, उद्धव ठाकरेंनी दिले महत्वाचे संकेत

मनसेने इंडिया आघाडीच्या बैठकीवर टीका केल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले की, “राज्यात दुष्काळाची परिस्थीती आहे याची आम्हाला जाणीव आहे, देशभरातून इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत महाराष्ट्राच्या संस्कृती व परंपरेनुसार केले जाणार आहे. झुणका भाकर, वडापाव व पुरणपोळी हे महाराष्ट्राचे खाद्यपदार्थ जेवणात असणार आहेत, ही मेजवानी कशी? राज्यात दुष्काळी परिस्थितीला तिघाडी सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे, मनसेने सरकारला जाब विचारला पाहिजे.”

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी