राज्य सरकारने सोमवारी मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय सहमती मिळवण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहात बैठक बोलवली. या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडावे यावर एकमत झाल्यावर मंगळवारी अंतरवाली सराटी येथे सरकारी दूत म्हणून संभाजी भिडे पोहचले आणि त्यांनी जरांगे पाटील यांनी उपोषण सोडावे अशी विनंती केली. यावेळी भिडे यांनी, ‘ शिंदे लबाड नाही, देवेंद्र फडणवीस बेईमान नाहीत, अजित पवार काळजी असलेला माणूस!’ असे सर्टिफिकेट सरकारला दिले. त्यामुळे भिडे नक्की उपोषण सोडवायला आले की सरकारची ‘प्रतिमा संवर्धन’ करायला, अशी चर्चा सुरू झाली.
यावेळी संभाजी भिडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कौतुक करत म्हणाले, “एक चांगली गोष्ट आहे की, आता जे राजकारणी सत्तेवर बसले आहेत त्यात एकनाथराव शिंदे अजिबात लबाड नाहीत. देवेंद्र फडणवीस बेईमानी करणार नाहीत. अजित पवार जरी राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील, तरी काळजी असलेला माणूस आहे.”
“हे आंदोलन तुम्ही जिवाच्या आकांताने चालवलं, यात दुमत नाही. तुम्हाला उपदेश करायला आलेलो नाही. तुम्ही करताहेत ती धर्माची समस्या आहे. तुमच्या तपश्चर्येला शंभर टक्के यश येणार आहे. तुम्ही फक्त ते राजकारणी आहेत म्हणून बिचकू नका. जो शब्द ते देतील, तो पाळून घेण्याचं काम माझ्याकडे सोपवा. एक घाव दोन तुकडे अशी ही लढाई नाही. तुमचा जो आग्रह आहे, त्या बाजूने ही लढाई यशस्वी होईल. तुम्ही हे उपोषण मोठ्या मनाने थांबवा. मी तुम्हाला नाउमेद करायला आलेलो नाही. या उपोषणाचा जो उद्देश आहे, तो यशस्वी होईपर्यंत आम्ही तुमच्यासोबत आहोत. अजिबात शंका घेऊ नका. माझी कळकळीची प्रार्थना आहे की, तुम्ही उपोषण थांबवावं.’
हे ही वाचा
मोदी सरकारच्या काळात कोणी सुखी नाही, फक्त एक व्यक्ती सुखी; नाना पटोलेंचा घणाघात
भीमाशंकरच्या सुविधासाठी १४८ कोटींच्या आराखड्यातील ६८ कोटी खर्च – मुख्यमंत्री शिंदे
‘हा लढा थांबवू नये. हा जिजा माऊलींचा, शहाजीराजेंचा तुम्हाला आलेला निरोप आहे, असं समजून तुम्ही हे आंदोलन थांबवावं’, असे म्हणत संभाजी भिडे यांनी मनोज जरांगे पाटील यांना उपोषण थांबवण्याचे आवाहन केले.