राजकीय क्षेत्रातील मान्यवरांपासून, उद्योजक, मनोरंजनविश्वातील कलाकार तसेच क्रिकेटर यांना श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी निमंत्रण केलं आहे. याच निमंत्रणावरून विरोधकांनी सत्ताधारी पक्षाला राम मंदिरावरून राजकारण करत असल्याचा दावा केला असल्याचं बोललं जात आहे. काही दिवसांआधी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी बोलावलं नसल्याच्या चर्चा आहेत. अशातच आता रामायण मालिकेतील (Ramayan Serial) लक्ष्मणाची भूमिका करणाऱ्या कालाकाराला निमंत्रण नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे. ‘रामायण’ या लोकप्रिय कार्यक्रमामध्ये रामाची आणि सीतेची भूमिका करणाऱ्या कलाकारांना निमंत्रित करण्यात आलं आहे. यामुळे आता लक्ष्मणाची भूमिका करणाऱ्या कलाकाराने निमंत्रणाबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. (Sunil lahri)
सीतामातेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलियाला आमंत्रित करण्यात आलं आहे. तसेच रामाची भूमिका करणाऱ्या रामायण मालिकेतील अरूण गोविलला निमंत्रित करण्यात आलं आहे. मात्र लक्ष्मणाची भूमिका साकारणाऱ्या सुनील लहरी यांना या दिमाखदार सोहळ्यामध्ये निमंत्रण नसल्याने ते दुखावले आहेत. सुनील यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले सुनील लहरी?
सुनील लहरी यांनी ई-टाईम्सशी बोलत असताना आपलं मत व्यक्त केलं आहे. ‘प्रत्येकवेळी बोलवायला हवं असं काही नाही. जर मला बोलावलं असतं तर मी नक्कीच गेलो असतो. मला इतिहासाचा भाग होता आलं असतं. पण हरकत नाही, काळजी करण्यासारखं काही नाही’.
View this post on Instagram
रामायण मालिकेच्या निर्मात्यांनाही निमंत्रण नाही
सुनील लहरी यांनी निर्मात्यांना आमंत्रित केलं नसल्याचं सांगितलं. ‘कदाचित त्यांना लक्ष्मणाचे पात्र तितकसं चांगलं वाटलं नाही. मी वैयक्तिकरित्या आवडत नसेल, मात्र मला आश्चर्य वाटत आहे की, त्यांनी एकाही निर्मात्याला बोलावलं नाही’.
‘कोणाला निमंत्रित करायचं आणि कोणाला नाही हा परस्पर समितीचा निर्णय आहे. मी ऐकलं आहे की, ७ हजार पाहुणे आणि ३ हजार व्हीआयपी मान्यवर येणार आहेत. त्यामध्ये रामायण मालिकेच्या संबंधित कलाकारांना तसेच निर्मात्यांना आमंत्रित करायला हवं होतं’, असं सुनील लहरी म्हणाले आहेत.