टीम लय भारी
मुंबई :- महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशात मागील काही दिवसांपासून तर नविन कोरोना रुग्णांची संख्या दोन लाखांपेक्षा जास्त आढळत आहे. इतकेच नव्हे तर १५ दिवसांत कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचीही संख्या तिपटीने वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी ट्विटरवर देशातील सध्याच्या कोरोना परिस्थितीवर आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी देशात सध्या आरोग्य यंत्रणा आणखी सक्षम करण्याची जास्त आवश्यकता असल्याचे मत मांडले आहे. यासाठी त्यांनी केंद्र सरकारने खासदार कोट्यातील निधींची पूर्तता करावी, अशी मागणी केली आहे. तसेच देशातील कोरोना परिस्थिती भयानक आहे. दररोज १५०० पेक्षा जास्त रुग्ण दगावत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने नव्या संसद भवनाच्या बांधकामावर पैसे खर्च करण्याआधी आरोग्य यंत्रणा उभारण्यासाठी लागणाऱ्या खर्चाला प्राधान्य द्यावे, असेही अमोल कोल्हे यांनी सूचवले आहे.
अमोल कोल्हे नेमके काय म्हणाले?
“आपला देश सध्या भयानक परिस्थितीशी झुंजत आहे. देशातील आरोग्याची पायाभूत सुविधा वाढवण्याची आवश्यकता आहे. भारताला सध्या नव्या संसद भवनाची नाही तर ऑक्सिजन प्लांट, कोव्हिड सेंटर, आरोग्यासाठी लागणारे महत्त्वपूर्ण साधनसामग्री यांची जास्त आवश्यकता आहे”, असे अमोल कोल्हे म्हणाले.
Our Country is under extraordinary situations. We are witnessing challenges which we didn’t witness ever for which we need to ramp up our health infrastructure. 1/4
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) April 20, 2021
‘MPLAD निधीचे पैसे द्या’
“देशात दररोज २ लाखांपेक्षा जास्त नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. त्याचबरोबर दररोज १५०० लोक आपल्या जवळच्या माणसाला गमावत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने प्राधान्याने नेमके कोणत्या ठिकाणी पैसे खर्च करावे याबाबत ठरवावे. त्याचबरोबर पंतप्रधान कार्यालयाने MPLAD निधी जाहीर करावे, जेणेकरुन खासदारांना आपापल्या मतदारसंघात आवश्यक उपाययोजना उभारण्यासाठी त्याचा वापर करता येईल”, अशी मागणी खासदार कोल्हे यांनी केली.