28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
HomeराजकीयBhagat Singh Koshyari : राज्यपाल कोश्यारीजी, राजीनामा देऊन तुम्ही गावी परत जा

Bhagat Singh Koshyari : राज्यपाल कोश्यारीजी, राजीनामा देऊन तुम्ही गावी परत जा

आदरणीय भगतसिंह कोश्यारीजी ( Bhagat Singh Koshyari ),

राज्यपाल,

महोदय ,

जय महाराष्ट्र

आपण ( Bhagat Singh Koshyari ) जेव्हापासून महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून महाराष्ट्रात आलात तेव्हापासून आपण राज्यपाल कमी भाजपाचे नेते म्हणूनच जास्त काम करीत आहात. राज्यपालपद हे संविधानिक पद आहे. तसे पाहिल्यास त्या पदाला जनतेच्या दृष्टीने काहीच महत्त्व नाही. ते शोभेचे पद आहे. हे आम्ही सर्वजण जाणतो.

सुरवातीपासूनच अशी एक प्रथा आहे की, केंद्रात ज्या पक्षाचे सरकार आहे, त्या पक्षात असलेल्या आणि अडगळीत पडलेल्या नेत्याला / कार्यकर्त्याला राज्यपाल केले जाते. केंद्राची अशी अपेक्षा असते की, ज्या राज्यात केंद्रातील पक्षाची सत्ता आहे त्या राज्यात राज्यपालांनी गप्प पडून राहावे.

Mahavikas Aghadi

आयुष्याच्या उत्तरार्धात जनतेच्या पैशावर मजा मारावी, चैन करावी आणि फक्त रबर स्टॅम्प म्हणून काम करावं. परंतु जेथे केंद्रातील पक्षाच्या विरोधातल्या पक्षाची सत्ता आहे तिथे राज्यपालांनी त्या सरकारच्या विरोधात काड्या घालत बसावे. त्या सरकारला सुरळीत काम करू देऊ नये.

छोट्या छोट्या बाबतीत लोकांनी निवडून दिलेल्या  सरकारपेक्षा मी कोणीतरी मोठा आहे हे दाखविण्यासाठी बालिश कृत्य करीत राहणे, बाळबोधपणे वागत राहणे. तसे पाहिल्यास हे पूर्णपणे चुकीचे आहे.

राज्यपाल पदाचा आदर ठेवण्यासाठी कोणतेही वृत्तपत्रे किंवा मीडिया सहसा त्यांच्या नादाला लागत नाहीत. राजभवनात काही गडबड जरी झाली तरी तिचा ते गौप्यस्फोट करीत नाहीत. झाकली मूठ सव्वा लाखाची असा तो सगळा मामला असतो.

मुळात राजभवन हे चिनी पोलादी भिंती सारखेच असते. गुप्तता किंवा शिष्टाचाराच्या नावाखाली बाहेर काही जात नाही. भारतातील राजभवन हे दारू पिण्याचा अड्डा आहे असे मत एका राज्याच्या राज्यपालांनीच व्यक्त केले आहे.

सगळं कसं ‘जनतेच्या पैशातून चाललेली ही लोकशाहीमधील राजेशाही’

महोदय, तुम्ही ( Bhagat Singh Koshyari ) आल्याआल्याच राजकारण खेळायला सुरुवात केलीत. सरकार स्थापन करण्यास भाजपाला भरपूर संधी दिलीत. इतकी संधी दिलीत की, रात्रभर जागून पहाटेच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातील जनता उठायच्या आत तुम्ही भाजपा सरकारचा शपथविधी उरकलात सुद्धा. तुम्हाला ( Bhagat Singh Koshyari ) वाटले की मस्त काम झाले. ज्यासाठी आपली नेमणूक झाली आहे ते काम आपण इमाने इतबारे केले.

तुमच्या आणि फडणवीस यांच्या कर्माने ते सरकार दोन दिवस दोन रात्रीतच गडगडले. तुम्ही ( Bhagat Singh Koshyari ) मात्र समाजमाध्यमात भरपूर हास्यास्पद ठरलात. महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरील व्यक्तीच्या संदर्भात ते पहिल्यांदाच घडत होते.

त्यानंतर महाआघाडीचे सरकार स्थापन झाले. नाइलाजास्तव आणि मनात नसताना फक्त संविधानाच्या बंधनामुळे तुम्हाला त्या सरकारला मान्यता द्यावीच लागली.

या सरकारच्या दुसऱ्या शपथविधी समारंभात तुम्ही ( Bhagat Singh Koshyari ) एका मंत्र्यांच्या शपथ घेण्याच्या प्रक्रियेला जोरदार विरोध दर्शविला. तुम्ही त्या मंत्र्यांचा जाहीर अपमान केला. तसेच तुम्ही किती नियमाने वागता हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न केलात. खरे म्हणजे त्या मंत्र्याचा जाहीर अपमान करण्याचा तुम्हाला काहीएक अधिकार नव्हता.

त्यांनी असा काही मोठा गुन्हा केला नव्हता. जर तुम्हाला त्या ( Bhagat Singh Koshyari ) मंत्र्यांच्या शपथ घेण्याच्या पद्धतीबद्दल काही आक्षेप होता तर तुम्ही त्यांना नंतर लेखी समज देऊन किंवा सरकारला लेखी पत्र देऊन नाराजी व्यक्त करू शकत होता. परंतु तुम्हाला एक संदेश द्यायचा होता की, मी फार कडक आहे. माझ्या कार्यकाळात असे काही चालणार नाही.

त्यानंतर तुम्हाला जेव्हा जेव्हा संधी मिळाली, त्या त्या वेळी तुम्ही संपूर्णपणे राजकारण खेळून राज्यपाल पदाची शोभा घालवित बसलात.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीच्या वेळी सुद्धा तुम्ही ( Bhagat Singh Koshyari ) त्यात किती कोलदांडा घातला. त्या फडणवीस टीमशी ( अतिशय सौम्य शब्द ) हातमिळवणी करून महाराष्ट्र सरकार कसे अस्थिर होईल याबाबत खलबतं करीत बसलात.

महाराष्ट्रातील जनता मूर्ख वाटली की काय तुम्हाला ? सगळं राजकारण तुम्हा लोकांनाच जमतं, समजतं. आम्हाला काहीच समजत नाही असं वाटतं का काय आपल्याला ? अहो आम्ही महाराष्ट्रातील जनता आहोत. स्वातंत्र्य काळापासून महाराष्ट्र भारतीय राजकारणात केंद्रस्थानी राहिला आहे.

एक प्रगत, हुशार, सुसंस्कृत, राज्य म्हणून संपूर्ण राष्ट्रात महाराष्ट्राची ख्याती आहे. काही अंधभक्त सोडल्यास या राज्यातील जनता सुज्ञ आणि राजकीय परिपक्वता असलेली आहे.

कोरोना राज्यात आल्यानंतर तुमच्यासाठी तर ती एक सुवर्णसंधीच मिळाली. ‘कोरोना’च्या नावावर तुम्ही ( Bhagat Singh Koshyari ) स्वतःचे दुसरे सत्ताकेंद्रच सुरू केले. सर्व बड्या अधिकाऱ्यांना राजभवनावर बोलावून तुम्ही त्यांची मिटिंग घेऊ लागलात. याबाबत तुमची तक्रार आदरणीय शरद पवार साहेबांसारख्या जेष्ठ नेत्याने खुद्द प्रधानमंत्र्याकडे केली.

कोरोनोच्या काळात तुम्ही ( Bhagat Singh Koshyari ) मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सहकार्य करण्यापेक्षा तुम्ही त्यांच्या कार्यात अडथळे कसे आणता येईल याबाबत खटाटोप करू लागलात.

आता हे पत्र लिहिण्याचा मुख्य उद्देश असा की, तुम्ही पुन्हा एकदा एका घटनेचं राजकारण करायला सुरुवात केली आहे.

महाराष्ट्र सरकारच्या उच्च – तंत्र शिक्षण खात्याने एक निर्णय घेतला की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेवटच्या वर्षातील शेवटच्या सेमिस्टरची परीक्षा घेतली जाईल आणि बाकी सर्व परीक्षा रद्द करून सर्व विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाईल. त्यानंतर सर्व संबंधित दहा लाख विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी या आदेशाला तीव्र विरोध केला. सरकारला वस्तुस्थिती दाखवून दिली.

त्यानंतर लगेचच सरकारने विशेषतः उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी तो निर्णय मागे घेऊन UGC ला त्याबाबत पत्र पाठविले. कोरोनोच्या वाढत्या संसर्गामध्ये परीक्षा घेता येणार नाही असे त्यांनी UGC ला लेखी कळविले.

UGC च्या निर्देशानुसार ५०% गुणांचे अंतर्गत मूल्यांकन आणि ५०% गुण मागील दोन वर्षाच्या सरासरीच्या आधारे देऊन पास करण्यासंदर्भात ते सकारात्मक आहेत.

सध्या सरकारचे आणि उदय सामंतांचे अभिनंदन होत असताना ते आपल्याला कसे पाहवेल ?  या निर्णयाची माहिती आपल्याला देण्यात आली नाही म्हणून तुमचा इगो दुखावला गेला. तेव्हा तुम्ही ( Bhagat Singh Koshyari ) या परीक्षा घेतल्याच पाहीजेत यासाठी हट्टाने आग्रह धरू लागलात.

या तुमच्या इगोला चुचकारण्याचे काम माजी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि भाजपा प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या काही पदाधिकाऱ्यांनी केले अशी जोरदार चर्चा आहे.

ज्या विनोद तावडेंच्या शिक्षणाच्या डिग्रीबाबत त्यांच्याच सरकारच्या काळात प्रश्न उपस्थित करण्यात आला. दारोदारी फिरून सुद्धा ज्यांना विधानसभेची तिकीट मिळाली नाही, त्या विनोदरावांनी १० लाख विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळण्याचा कृपया प्रयत्न करू नये. त्यांनी गप्प बसावे. या रिकामटेकड्या काळात आणखी कोणत्या ज्ञानेश्वर विद्यापीठाची डिग्री मिळते का हे त्यांनी पाहावे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची या बाबतची भूमिका भाजपाशासित गोवा, राजस्थान या राज्यात वेगळी आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी वेगळी अशी आहे. त्यामुळे त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा नाही. ज्यांचा राजकारणाचा पायाच इतका दुतोंडी आहे, त्यांच्याकडून भावी राजकारणाविषयी काय अपेक्षा ठेवायची ?

राज्यपाल महोदय, तुमच्या या वैयक्तिक हट्टापायी राज्यातील दहा लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचा आपण प्रयत्न केला तर त्यानंतर होणाऱ्या सर्व परिणामास आपण जबाबदार राहाल.

या दहा लाख तरुण तरुणींच्या जीवाशी खेळण्याचा आपल्याला कोणी अधिकार दिला ? फडणवीस यांच्यासारखे आपण सुद्धा महाराष्ट्र द्वेषी कसे असू शकता ?

परीक्षेच्या काळात कोणत्याही विदयार्थ्यांस कोरोना झाल्यास त्याच्या औषध उपचाराचा संपूर्ण खर्च आपल्या पगारातून केला जावा.

जर दुर्दैवाने एखाद्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यास आपण आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा देऊन आपल्या गावी उत्तराखंड येथे निघून जावे.

साहेब, तुमचं राजकारण गेलं चुलीत. आमच्या मुलामुलींच्या शैक्षणिक जीवनात अशा प्रकारे हस्तक्षेप करून राजकारण करण्याचा आणि त्यांच्या जीवनाशी खेळण्याचा तुम्हाला काहीएक नैतिक अधिकार नाही.

छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू,  आंबेडकरांचा हा ज्वलंत, जीवंत आणि धगधगणाऱ्या विचारांचा महाराष्ट्र आहे. तो कधीही असले हीन राजकारण सहन करणार नाही.

जय महाराष्ट्र !!!

आपला ,

अ‍ॅड. विश्वास काश्यप

(लेखक निवृत्त पोलीस अधिकारी आहेत व सध्या मुंबई उच्च न्यायालयात वकिली करतात)

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्र्यांवर ‘मंत्री कपात’ करण्याची वेळ येईल : संजय राऊत

Mahavikas Aghadi : राज्यातील 12 कोटी नागरिकांना 1000 आजारांवर मोफत उपचार, GR जारी

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या कणखरपणामागे कार्यरत आहे पडद्यामागील ‘खास माणसां’ची फौज

‘Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari is ‘BJP agent’

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी