इगतपुरी तालुक्यातील भावली धरण ( Bhavli dam) परिसरात पर्यटनासाठी गेलेल्या पाच जणांचा धरणात बुडून( family drown) मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजता घडली. मृतांमध्ये तीन मुलींसह दोन तरुणाचा समावेश आहे. हे सर्वजण नाशिकरोड येथील गोसावीवाडीतील रहिवासी आहेत. या घटनेमुळे गोसावीवाडी परिसरावर शोककळा पसरली आहे.हनीफ अहमद शेख (24), अनस खान दिलदार खान (15), नाझिया इमरान खान (15), मीजबाह दिलदार खान (16) आणि ईकरा दिलदार खान (14 सर्व रा. गोसावीवाडी, नाशिकरोड) अशी मृतांची नावे आहेत. भावली धरणात सायंकाळी 5 वाजता खेळत असताना तोल गेल्याची माहिती इगतपुरी पोलिसांनी दिली आहे.(Five members of a family drown in Bhavli dam in Igatpuri)
याबाबत अधिक माहिती अशी की, गोसावीवाडी येथून मंगळवारी (दि. २१) साडेतीन वाजता हनीफ शेख हे त्यांच्या बहिणीच्या मुली व मुलांसह फिरण्यासाठी भावली धरण परिसरात गेले. शेख हे रिक्षा चालक असून, रिक्षेतूनच पाचही जणांनी प्रवास केला. यापूर्वीही ते भावली धरणात फिरण्यासाठी गेल्याने त्यांनी पुन्हा तेच ठिकाण निवडले.
पाण्यात डुबकी मारण्याचा निर्णय जीवावर बेतला
भावली धरण परिसरात पर्यटनाचा आनंद लुटल्यांतर धारण्याच्या पाण्यात डुबकी मारण्याचा धाडसी निर्णय या तरुणांनी घेतला आणि तोच त्यांच्या जीवावर बेतला. पाण्यात सुरुवातीला दोन जण बुडत होते. त्यांना वाचविण्यासाठी इतरांनी उडी मारली आणि एका पाठोपाठ 5 जणांचा मृत्यू झाला. या प्रकाराची माहिती मिळताच परिसरातील आदिवासींनी धाव घेतली व या घटनेची माहिती इगतपुरी पोलिसांना कळवली.
धरण परिसरात सुरक्षा रक्षक नाही
पथकाने धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने पाचही जणांना बाहेर काढले. त्यांना इगतपुरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच शेख व खान कुटुंबीय इगतपुरीकडे रवाना झाले. गोसावी वाडीत घटना वाऱ्यासारखी पसरताच स्थानिक नागरिकांनी गर्दी केली. तर नातेवाईक हे रुग्णालयात दाखल झाले. धरण परिसरात ही सुरक्षा रक्षक नसल्यानं धरण सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आलाय.