टीम लय भारी
नवी मुंबई : नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामांतराचा प्रश्न सुटल्याचे दिसत आहे. नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत होती. यासाठी बरीच आंदोलने करण्यात आली. परंतु या विमानतळाला शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे, असा प्रस्ताव राज्य सरकारकडून देण्यात आला होता. त्यामुळे या मुद्द्यावरून स्थानिक सर्वपक्षीय कृती समिती प्रकल्पग्रस्त विरुद्ध राज्य सरकार असा वाद गेल्या काही महिन्यांपासून सुरु होता.
आता या कृती समितीकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यात आली. या भेटीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आता या विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
यावेळी या कृती समितीकडून बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यावर नामकरणाच्या मुद्द्यावरून आरोप करण्यात आले. एकनाथ शिंदे यांनी नामकरणाच्या मुद्द्यावरून भांडणे लावली. तसेच, त्यांनी नामकरणाच्या मुद्द्यावरून योग्य माहिती प्रस्ताव देखील मंत्रिमंडळात दाखल केला नव्हता. त्यामुळे नामकरणाचा मुद्दा चिघळला. पण आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दि. बा. पाटील यांच्या नावाला काहीच हरकत नसल्याचे या कृती समितीला सांगितले आहे.
हे सुद्धा वाचा :
सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझे पती सदानंद सुळेंशी भांडण झाले तर…