टीम लय भारी
नगर : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील सरकार येऊन एक वर्ष पूर्ण झाले. या सरकारच्या कालखंडात पहिल्या दिवसापासून अनेक आपत्ती आल्या. नैसर्गिक आपत्ती आल्या. कोरोनाची आपत्ती आली, अतिवृष्टी झाली, शेतकरी अडचणीत आला. त्यामुळे या अनैसर्गिक सरकारकडे कुठलाही दूर दृष्टिकोन नाही. हे अनैसर्गिक महाविकास आघाडी सरकार म्हणजे महाराष्ट्रावर आलेले एक मोठे अनैसर्गिक संकट असल्याचे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री प्रा. राम शिंदे म्हणाले.
या पुरोगामी महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांची भाषा अर्वाच्य असून जनतेच्या मनामध्ये भीती निर्माण करणारी आहे. सरकारकडे कुठलाही विकासाचा मुद्दा नाही. राज्य सरकार दमबाजी आणि दमदाटी करणार असल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये झाली आहे. राज्यातील सध्याचे हे सरकार लवकरच कोसळेल कारण हे सरकार जनतेच्या मनातील सरकार नाही, अशी टीकाही माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केली.