राज्यात रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत जमावबंदी
टीम लय भारी
मुंबई : राज्यात कोरोना महासाथीची दुसरी लाट आली आहे. दररोज कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात रात्रीची जमावबंदी लागू करण्याची सूचना दिली होती. त्यानुसार आदेश जारी करण्यात आले असून आजपासूनच हा आदेश लागू असणार आहे.
राज्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन शुक्रवारीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची बैठक घेतली होती. या बैठकीत स्थितीचा आढावा घेऊन रविवारपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार आज लॉकडाऊन वाढवण्यासोबतच जमावबंदीचा आदेशही जारी करण्यात आला आहे. हा आदेश १५ एप्रिलपर्यंत लागू राहणार आहे.
टाळेबंदी म्हणजेच लॉकडाऊन लागू करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन होता. परंतु लॉकडाऊनमुळे सारे जीवनमान बदलते हा पूर्वानुभव लक्षात घेता सरसकट लॉकडाऊन लागू केले जाणार नाही. त्याऐवजी रविवारी रात्रीपासून जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पाच किंवा त्यापेक्षा अधिक नागरिक बाहेर एकत्र फिरू किंवा जमू शकणार नाहीत.
नाईट कर्फ्यूमध्ये पब आणि हॉटेल्स बंद राहणार
आम्ही पाहत आहोत, ज्या सोसायटींमध्ये पाच पेक्षा अधिक कोरोनाबाधित आढळतील, त्या सोसायटी सील केल्या जाणार आहे. झोपडपट्टी व चाळींमध्ये मोठ्या संख्येने कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून येत आहेत. तर, नाईट कर्फ्यूमध्ये पब आणि हॉटेल्स बंद राहणार आहेत. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील– महापौर किशोरी पेडणेकर
असे आहेत नियम
- सर्व सिनेमागृहे, मॉल, ऑडिटोरियम आणि रेस्टॉरंट्स रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात यावीत. होम डीलिव्हरी आणि टेक अवे यासाठी मात्र या वेळेत परवानगी असेल.
- कोणत्याही सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमास मनाई राहील. अशा कार्यक्रमांसाठी नाट्यगृह व सभागृह वापरण्यासही मनाई असेल.
- लग्न समारंभासाठी ५० जणांच्या उपस्थितीची मर्यादा असेल तर अंत्यसंस्काराला २० जण उपस्थित राहू शकतील.
- आरोग्य आणि अन्य अत्यावश्यक सेवा वगळता सर्व खासगी कार्यालयांमध्ये ५० टक्के कर्मचारी उपस्थितीचे बंधन राहील.
- आधी जारी करण्यात आलेले यासंबंधीचे सर्व आदेश ३० एप्रिलपर्यंत अमलात राहतील.
असे असतील दंड
- पाचपेक्षा अधिक लोक एकत्र आल्यास प्रत्येकी १ हजार दंड
- राज्यात रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत या वेळेत पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. तसे झाल्यास प्रत्येकी १ हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल.
- आदेश मोडल्यास प्रत्येकी १ हजार रुपये दंड
- सर्व सार्वजनिक ठिकाणे (उद्याने आणि समुद्र किनारे) रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत बंद राहतील. २७ मार्च रोजी मध्यरात्रीपासून हा आदेश लागू होईल. हा आदेश मोडला गेल्यास प्रत्येकी १ हजार रुपये दंड करण्यात येईल.