टीम लय भारी
पुणे : कोरोना महामारीमुळे दोन वर्षांपासून आषाढी वारी बंद होती. या वर्षी कोरोनाचे निर्बंध नसल्याने वारीला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे वारकरी आनंदीत झाले आहेत. या वर्षी पालखी सोहळ्यात संविधानाचा गजर होणार आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे.
21 जूनला ज्ञानेश्वरांच्या पालखीचे आळंदी येथून प्रस्थान होणार आहे. या पालखी बरोबरच संविधान दिंडीचे देखील आयोजन करण्यात आले आहे. या दिंडीत संविधानिक मूल्यांचा गजर केला जाणार आहे. भजन,कीर्तन, अभंगाच्या माध्यमातून ही दिंडी 10 जूलै रोजी पंढरपूरला पोहोचणार आहे. मंगळवारी 21 जूनला आळंदी येथील चरहोली फाटा येथे दुपारी 3 वाजता या दिंडीचे उध्दाटन होईल. तर 22 जूनला संविधान दिंडी विठोबा मंदिर भवानी पेठ येथे मुक्काम करेल. या ठिकाणी सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल.
23 जूनला नानापेठ येथे संविधान ‘जलसा‘ हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला धनंजय मुंडे, नसिरुदीन शहा, नागराज मंजुळे, निलेश नवलखा, शबाना आझमी, रत्नाकर पाठक, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त डाॅ. प्रशांत नारनवरे ,बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये उपस्थित राहणार आहे.
24 जून ते 10 जूलैपर्यंत संविधानातील विविध मूल्यांवर आधारित प्रवचने, कीर्तने, सप्तखंजिरी कीर्तन आदी कार्यक्रम होणार आहेत. पालखी सोहळा आणि संविधान दिंडीच्या ठरलेल्या मार्गावर या कार्यक्रमांचे बार्टीमार्फत आयोजन करण्यात आले आहे. पालखी सोहळयात हरिनामासह संवैधानिक मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश या निमित्ताने करण्यात आला आहे.
हे सुद्धा वाचा :
VidhanParishad Eection 2022 : राष्ट्रवादीच्या आमदाराने स्वतःच्याच सरकारला खिंडीत गाठले