महापालिकेच्या शिक्षण विभागाने सन २०१७ मध्ये राबविलेल्या शिक्षक भरतीप्रक्रियेतील ९७३ उमेदवारांचे परिक्षा शुल्क परत केले जाणार आहे.या प्रक्रियेत सहभागी झालेल्या ९७३ उमेदवारांचे सुमारे तीन लाख २७ हजार ७०० रुपये पालिकेकडे थकीत होते. या शुल्कासाठी बेरोजगार युवक सहा वर्षापासून शिक्षण विभागाकडे चकरा मारत होते. अखेर ओबीसी महासंघाच्या दणक्यानंतर उमेदवारांना हे शुल्क परत केले जाणार आहे. शिक्षण विभागाकडून जून २०१७ मध्ये विनाअनुदानित मराठी माध्यमाच्या पाच व अनुदानित उर्दू माध्यमांच्या चार शाळांमध्ये मानधन तत्त्वावर २१ पदांसाठी भरतीप्रक्रिया राबविण्यात आली होती.यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करत त्यात खुल्या पाचशे तर राखीव प्रवर्गातून
तिनशे रुपये शुल्क घेत भरती घेतली होती.
राज्यभरातील ९७३ इच्छूक उमेदवारासाठी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केले होते. मात्र, तत्कालीन आयुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदांची गरज नसल्याचे सांगत ही भरती प्रक्रिया रद्द केली. त्यामुळे या उमेदवारांची परीक्षा झालीच नाही तसेच रद्द केलेल्या भरतीप्रक्रियेच्या संदर्भात उमेदवारांना कोणतीही सूचना देण्यात आली नाही. भरती प्रक्रिया रद्द झाल्यामुळे उमेदवारांचे भरलेले शुल्क परत करणे अपेक्षित होते. परंतु, ही भरतीप्रक्रिया रद्द होऊन सहा वर्ष उलटूनही उमेदवारांना अर्ज नोंदनी शुल्क परत भेटले नव्हते.त्यामुळे उमेदवारांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.
असे मिळवा शुल्क परत
शिक्षण विभागाने या उमेदवारांसाठी जाहीर नोटीस प्रसिद्ध केली असून त्यांना शुल्क परताव्यासाठी दहा दिवसांची मुदत दिली आहे. परीक्षा शुल्क भरणाऱ्या उमेदवारांनी त्यांचे बँका खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे दहा दिवसांत जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, महापालिकेचे मुख्यालय राजीव गांधी भवनातील शिक्षण विभागात बैंक पासबुकची झेरॉक्स जमा केल्यानंतर उमेदवारांच्या बँक खात्यावर पैसे आरटीजीएस केले जाणार आहे.
प्रतिक्रीया
उमेदवारांच्या परीक्षा शुल्कसाठी आम्ही सहा वर्षापासून महापालिकेत चकरा मारत आहोत. अखेर मनपाने शुल्क परत करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे उशिरा का होईना आम्हाला न्याय मिळाल्याचे समाधान आहे.
हेमंत शिंदे, अध्यक्ष, ओबीसी महासंघ