महापालिकेने पस्तीस कोटी खर्च करुन रस्ते साफसफाईसाठी चार यांत्रिकी झाडू खरेदी केल्याने नवीन सफाई कर्मचारी ठेक्यात कर्मचार्यांची संख्या घटेल ही अपेक्षा फोल ठरली आहे. घनकचरा विभाग सातशे कर्मचारी दिमतीला असताना त्यात आणखी १७६ सफाई कर्मचारी वाढवले आहे. तीन वर्षात त्यांच्या वेतनावर १७६ कोटी रुपये खर्च ठेकेदारला अदा केले जाणार आहे. त्यास महासभेने मंजुरी दिली असून एकूणच मनपाकडून ठेकेदार पोसण्याचे काम जोरात सुरु असल्याचे चित्र आहे.आयुक्त डाॅ.करंजकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महासभेत हा विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता.मनपा शिक्षण विभाग व मिळकत विभाग यांच्याकडून एकूण १५२ ठिकाणी साफसफाईकामी मनुष्यबळाची आवश्यकता आहे.
शिवाय महाकवी कालिदास कला मंदिर, महात्मा फुले कलादालन, मनपाची सर्व नाटयगृहे, सभागृहे, जलतरण तलाव आदी ठिकाणी उपस्थितांची संख्या, नियमित होणारे कार्यक्रम तसेच मनपा शाळांच्या शौचालये, मुतारी या सर्व साफसफाइसाठी साधारणतः १७५ कंत्राटी मनुष्यबळाची आवश्यकता आहे. या स्वच्छता कर्मचारी भरतीस महासभेने मंजुरी दिली. मुळ वेतन, पीएफ, इएसआयसी व बोनस असा एका स्वच्छता कर्मचार्यावर महिन्याला
२५ हजार रुपये खर्च येणार आहे. तीन वर्षासाठी हा खर्च पावणेदोन कोटी खर्च होईल.
असे आहे मनुष्यबळ
महाकवी कालिदास कला मंदिर, महात्मा फुले कलादालनसह मनपाची सर्व नाटयगृहे, सभागृहे स्वच्छतेकरीता ८२, जलतरण तलाव येथे १२ असे एकूण ९४ मनुष्यबळ. मनपा शाळांच्या स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेकरीता एकूण ८१ मनुष्यबळ यानुसार एकूण १७५ कंत्राटी मनुष्यबळ नियुक्त केले जाईल.