प्रधानमंत्र्यांचे स्वच्छ भारतचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता असून आपल्या घराप्रमाणे आपलं गाव, शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. तसेच सध्याच्या परिस्थितीत शिक्षणासोबत विविध कौशल्य आत्मसात करण्याची नितांत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.नाशिकमध्ये QCI च्या विद्यमाने नाशिक महानगरपालिका, नाशिक जिल्हा परिषद, नाशिक सिटीझन्स फोरम, क्रेडाई, रामकृष्ण आरोग्य संस्थान आणि इतर तीसपेक्षा जास्त संस्थांच्या सहभागातून ‘क्वालिटी सिटी’ अभियान हाती घेण्यात आले आहे. या माध्यमातून आज ताज हॉटेल नाशिक येथे सरपंच संवाद सोहळा पार पडला.
या सोहळ्यात मंत्री छगन भुजबळ यांनी दृक्यश्राव्य माध्यमातून मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, मनपा आयुक्त डॉ.अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, उद्योजक जित्तूभाई ठक्कर, विक्रम सारडा,QCI चे हिमांशू पटेल,कृणाल पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व सरपंच उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, देशभरातील सरपंचांना एका व्यासपीठावर आणण्याची मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी मांडलेली संकल्पना साकार करण्यासाठी क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडीया अर्थात QCI प्रयत्नशील आहे. त्यासाठी ‘सरपंच संवाद’ हा उपक्रम QCI ने हाती घेतला आहे. त्याद्वारे देशभरातील सुमारे अडीच लाख सरपंचाना एकाच डिजीटल प्लॅटफॉर्मवर आणू शकेल असे अँप QCIने कार्यान्वित केले आहे. देशभरातील सरपंचांना परस्परांशी माहिती, अनुभवाचे आणि ज्ञानाचे आदानप्रदान करण्यासाठी हे अॅप उपयुक्त ठरत
असूनअशा स्वरुपाचे हे देशातील पहिलेच अभियान आहे. याच अभियनाचा गावपातळीपर्यंत विस्तार करण्यासाठी ‘सरपंच संवाद’ उपक्रमाचे आयोजन नाशिक येथे करण्यात आले ही अतिशय महत्वपूर्ण बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, क्वालिटी सिटी अभियानाच्या धर्तीवर शिक्षण, स्वच्छता आणि कौशल्य या क्षेत्रांतील दर्जा उन्नतीकरणासाठीही सरपंचांना प्रेरीत करण्यासाठी हा कार्यक्रम महत्वाचा आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियान सुरू केलं आहे. तसेच महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वी स्व.आर आर आबा पाटील यांनी देखील ग्रामस्वच्छता अभियान सुरू केले होते. तसेच मुंबईचा महापौर आणि नगरसेवक म्हणून काम करताना स्वच्छ सुंदर मुंबई हे अभियान आपण सुरू केले असल्याचे दाखले देत गावांच्या आणि शहरांच्या विकासासाठी स्वच्छता हा अतिशय महत्वाचा घटक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच स्वच्छता असेल तर आरोग्याचे प्रश्न भेडसावणार नाही. त्यामुळे आपण आपल्या घराप्रमाणे आपलं गाव शहर नद्या स्वच्छ सुंदर ठेवण्यात असे आवाहन त्यांनी केले.
ते म्हणाले की, आज ज्ञान हेच सर्वात महत्वाचे भांडवल आहे. त्यासाठी परिपूर्ण शिक्षण घेऊन विविध क्षेत्रातील कौशल्य आत्मसाद करण्याची आवश्यकता आहे. या कौशल्य विकासामुळे देशात आणि परदेशात नोकरीच्या अनेक संधी आपल्याला उपलब्ध झाल्या आहे. त्यामुळे गाव पातळीवर दर्जात्मक शिक्षण देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. तसेच विविध संघटना आणि शासनाने एकत्र येऊन सुरू केलेला स्वच्छता, शिक्षण व कौशल्याचा उपक्रम हा अतिशय महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.