राज्यात मान्सून दाखल झाला आहे. दरवर्षी केरळमध्ये 1 जून रोजी येणारा मान्सून यंदा 4 जून रोजी आला संपूर्ण राज्यात 15 जूनला हजेरी लावणारा मान्सून ह्यावर्षी 25 जून रोजी आला. बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनच्या आगमनामध्ये उशीर झाला होता पण गेल्या काही दिवसात पुणे, मुंबईत पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे. राज्यात पुढील पाच दिवस मान्सून कसं असणार याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. रविवारी मान्सूनच्या आगमनासोबत मुंबईत मुसळधार पाऊस झाल्याने भारतीय हवामान विभागाने मंगळवार व बुधवारसाठी मुंबई शहरासह शेजारील ठाणे आणि पालघर जिल्हयांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मंगळवार आणि बुधवार 24 तासांच्या कालावधीत 115.5 मिमी पेक्षा जास्त मुसळधार पावसाच्या शक्यतेबद्दल नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
पुण्यातील आयएमडीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ केएस होसाळीकर यांच्या मते, उत्तरेकडे सरकत असताना मुंबई आणि उपशहरासह कोकणात मान्सूनचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस अपेक्षित आहे. ज्यामुळे कोकण, विदर्भ, आणि मध्य महाराष्ट्रासाठी देखील अलर्ट जारी केले आहेत. विदर्भात काही भागांमध्ये यल्लो अलर्ट देण्यात आला आहे. तर नाशिक, सातारा आणि पुणे जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
हे सुद्धा वाचा:
सैनिक प्रवेश परिक्षेत राजवर्धन भानुसेचा अटकेपार झेंडा
मडगाव-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस उद्यापासून सुरु होणार, जाणून घ्या वेळापत्रक
राज्यात तलाठी पदांची भरती; जाणून घ्या कुठे आणि कसा भरता येणार अर्ज
आयएमडी मुंबईच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईतील अतिवृष्टी तीन सिनोप्टिक परिस्थितींमुळे होऊ शकते. “ओडिशामध्ये कमी दाबाचा पट्टा असून तो मध्य प्रदेशकडे सरकण्याचा अंदाज आहे. शिवाय एक मजबूत ऑफशोअर कुंड आहे. शेवटी, ईशान्य अरबी समुद्र आणि लगतच्या गुजरात किनारपट्टीवर चक्रीवादळ आहेत. या सिनोप्टिक परिस्थितींमुळे पश्चिमेकडील प्रदेश तीव्र होत असून, मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे.