28 C
Mumbai
Sunday, June 16, 2024
Homeमहाराष्ट्रराज ठाकरेंनी मराठा आंदोनलावरुन राज्याच्या कारभाऱ्यांना सुनावले; म्हणाले....

राज ठाकरेंनी मराठा आंदोनलावरुन राज्याच्या कारभाऱ्यांना सुनावले; म्हणाले….

जालन्यात मराठा मोर्चावरील लाठीचार्जवर राज्यातील विविध राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भर पडली असून, ‘इथं सरकार चुकलं हे निश्चित! अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली आहे. जालन्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मराठा आक्रोश मोर्चातील आंदोलकांवर शुक्रवारी झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्जवर विरोधी पक्षातील महत्वाच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असताना राज ठाकरे शांत का, असा सवाल केला जात असताना त्यांनी प्रथमच आपली प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मराठा आक्रोश मोर्चातील आंदोलकांवर झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्जवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात काल मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून लाठीमार झाला आणि गर्दी पांगवण्यासाठी हवेत गोळीबारही झाला. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि मी याचा निषेध नोंदवतो,’ असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं. तसेच इथं सरकार चुकलं हे निश्चित, असं म्हणत शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर हल्लाबोल केला.

मराठा आंदोलन लाठीचार्ज; विरोधक सरकारवर तुटून पडले!
या सर्व घटनेला सरकार जबाबदार असून, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. हे गृहविभागाचे अपयश असून, फडणवीस यांनी राजीनामा देण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय विजय वडेट्टीवार आणि माजी मुख्यंमत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. शांतपणे आंदोलन करणाऱ्या वेचून वेचून मारण्याची ही कोणती मर्दुमकी आहे, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केला. सबका साथ, सबका विकास… अशा भूलथापा देऊन हे केंद्र सरकार सत्तेवर आले आहे. या सरकारच्या काळात सिलेंडरचे दर १२०० रुपयात मिळत आहे. असे असताना फक्त २०० रूपये सिलेंडरचे कमी करून हे सरकार जनतेला फसवत आहे, असा आरोपही ठाकरे यांनी केला.

हे सुद्धा वाचा 
शरद पवार मराठा आंदोलकांना भेटणार!
पोलिसांचा मुर्खपणा, शिंदे – फडणवीस यांना डोकेदुखी!
उद्धव ठाकरे जालना दौऱ्यावर, जखमी मराठा आंदोकांची भेट घेणार!

जालना येथे अमानुष लाठीचार्ज केल्यामुळे महिलांसह अनेक उपोषणकर्ते गंभीरपणे जखमी झाले आहेत. या घटनेचा निषेध व्यक्त करीत गृहमंत्र्यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारुन तात्काळ राजीनामा द्यायला हवा अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. पण आता तर हे शांततापूर्ण आंदोलन दडपण्याचे काम सरकारकडून सुरु आहे. आंदोलन दडपण्याचे आदेश मुंबईतून दिले असल्याचे कळते. या निंदनीय घटनेची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांचा त्वरित राजीनामा घेतला पाहिजे असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.

मराठा आरक्षण देण्याबाबत भाजपने कायमच पोकळ घोषणा आतापर्यंत केल्या आहेत. केंद्रात व राज्यात भाजपचेच सरकार असताना मराठा समाजाला भाजपा सरकार आरक्षण का देऊ शकत नाही? हे सरकारने स्पष्ट करावे. इतकी वर्षे प्रलंबित असणारा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मराठा बांधवांच्याकडून आंदोलन करुन सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरु असताना, अशावेळी आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी त्यांचे आंदोलनच दडपण्याचा क्रूर प्रकार सरकारकडून केला जात आहे. मराठा बांधवांवर झालेल्या लाठीचार्जची घटना निंदनीय असून या घटनेची गृहमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारुन तात्काळ राजीनामा द्यायला हवा अशी मागणी आम्ही करत असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

गृहविभागाचे अपयश
जालना येथे झालेल्या संपूर्ण प्रकरणाची निपक्ष चौकशी करण्यात यावी, यातील सर्व दोषींवर कारवाई करावी. या प्रकरणात सर्व गृहविभागाचे अपयश असून, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
गृह विभागाच्या आदेशाशिवाय लाठीमार अशक्य : रोहित पवार
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या जालन्यातील 8 तारखेच्या नियोजित कार्यक्रमाला अडचण येईल म्हणून हे आंदोलन दडपण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनी केला आहे. दरम्यान गृह विभागाच्या आदेशाशिवाय हा लाठीमार होत नसतो म्हणत रोहित पवार यांनी अप्रत्यक्षपणे गृहमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली. रोहित पवार यांनी पहाटे अडीच वाजता समन्वयक मनोज जरांगे यांच्या कुटुंबाशी संवाद साधून विचारपूस केली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा देखील केली.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी