30 C
Mumbai
Sunday, September 22, 2024
HomeमुंबईCorona : कोरोना रुग्णात वाढ, दुसरी लाट सुरू?

Corona : कोरोना रुग्णात वाढ, दुसरी लाट सुरू?

टीम लय भारी : अतुल माने, जेष्ठ पत्रकार

मुंबई : अनलॉक आणि न्यू नॉर्मलच्या नावाखाली नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी स्वैर हुंडलेले लोक, पर्यटन स्थळी झालेली तोबा गर्दी याचा परिणाम कोरोना (Corona) रुग्ण वाढीत गेल्या दोन ते तीन दिवसापासून दिसत आहे. ही एक प्रकारे दुसऱ्या लाटेची घंटा मानली जात आहे. त्यातच कोरोना नवीन विषाणू आणि बर्ड फ्ल्यू याचीही नांदी सुरू झाली आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील प्रमुख शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे. एरव्ही नववर्षाच्या आधी ठाणे, पुणे, नागपूर , मुंबई तसेच अन्य ठिकाणी रुग्ण संख्या घटत चालली असल्याचे दिसत होते. राज्यात हा आकडा दोन ते तीन हजार एवढा होता. गेल्या महिन्याच्या तुलनेने ही संख्या कमी होती. पण आता सोमवार पासून त्यात झपाट्याने वाढ होत आहे. आधी हा आकडा तीन हजार एवढा होता पण बुधवारपासून तो साडेचार हजारावर येऊन ठेपला आहे. त्यामध्ये मुंबई ची रुग्णसंख्या ही 500 वरून 900 वर तर ठाणे मध्ये 500 च्या आसपास , नाशिक 366, पुणे शहर आणि जिल्हा मिळून त्यामध्ये पिंपरी चिंचवड समाविष्ट केले तर ही संख्या 800 पर्यन्त जाते. तर नागपूर मध्ये सुद्धा 450 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कल्याण डोंबिवली मध्ये 200 रुग्ण मिळाले असल्याने आता चिंता व्यक्त होत आहे.

याबाबत राज्य कोरोना कृती दलाचे प्रमुख डॉ संजय ओक यांनी सांगितले की, या सर्व स्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत. जानेवारीत कोरोना ची दुसरी लाट येऊ शकते का याचा आम्ही नेहमी आढावा घेत होतो. नाताळ आणि नव वर्षाच्या स्वागतासाठी लोक मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी बाहेर पडले. त्यावेळी नियमांचे पालन करण्याचे आवाहन सातत्याने विविध माध्यमातून आम्ही त्यांना करत होतो. गेली काही दिवस रुग्ण संख्या कमी झाली होती, पण दोन दिवसापासून त्यात अचानक वाढ होऊ लागल्याचे दिसत असून ते काळजीचे निश्चितच असल्याचे ओक म्हणाले. लस मान्यता मिळाली असली तरी लोकांनी काळजी घेतलीच पाहिजे असे स्पष्ट करुन ओक म्हणाले की, लस मिळाली तरी मास्क वापरणे, सोशल डिस्टन्स हे नियम कायम पाळावे लागतील.

यापूर्वी कोरोना होऊन गेलेल्या अनेक रुग्णांना आता वेगळे त्रास सुरू झाले आहेत, त्याला पोस्ट कोविड म्हणतात. अनेकांचे ह्रदयविकाराचा झटक्याने अथवा अन्य कारणामुळे मृत्यू झाले आहेत. हे प्रमाण 2 टक्के आहे असे डॉ ओक यांनी सांगितले. यापूर्वी कोरोना होऊन गेलेल्यानी नियमितपणे स्वतःची तपासणी करावी, असे आवाहनही ओक यांनी केले आहे.

ब्रिटन मधून आलेल्या कोरोनाच्या नव्या जनुकीय अवतारामुळे देशात आतापर्यंत 71 रुग्ण मिळाले असून दिवसेंदिवस त्यामध्येही वाढ होत आहे. विदेशातून येणाऱ्या बहुतांशी लोकांनी मुंबई विमानतळावर होणारी सक्तीची कोरोना चाचणी टाळण्यासाठी हेद्राबाद अथवा अन्य राज्यातील विमानतळ पर्याय स्वीकारला आहे. या विमानतळावर कोरोना ची कोणतीही चाचणी होत नसल्याने हे प्रवाशी विनासायास तेथून महाराष्ट्र मध्ये आंतरदेशीय विमानसेवा अथवा रस्ता मार्गाने येत आहेत. लोकांची ही बेपर्वाई कोरोना रुग्ण संख्या वाढविण्यासाठी भविष्यात हातभार लावणार आहे.

आतापर्यंत देशात कोरोना रुग्णाची संख्या ही एक कोटी , तीन लाख चोवीस हजारावर पोहचली आहे. मृत्यू संख्या ही एक लाख एकोण पन्नास हजारावर पोचली आहे. राज्यातील कोरोना रुग्णाची संख्याही आता वाढत असून रुग्णवाहिकेच्या सायरणच्या आवाज दोन दिवसांपासून मोठया प्रमाणावर ऐकू येत आहेत. ही जर खरोखरच दुसऱ्या लाटेची सुरुवात असेल तर सर्वानी आतापासूनच काळजी घ्यावी लागणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी