टीम लय भारी
मुंबई : उपनगरातील अत्यल्प उत्पन्न गटाकरिता हिरानंदानी समुहाकडून घरे उभारण्यात आली होती. दरम्यान, या समुहाकडून घरे उभारणीत अनियमितता करून गरीब मध्यमवर्गीयांची घरे स्वस्त दरात उच्चभ्रू लोकांना विकल्याचा आरोप (Homes of the poor sold to the rich) मनसेने केला आहे. या विरोधात मनसेतर्फे हिरानंदानी समुहाविरोधात पवईत आंदोलन (MNS Protest) करण्यात आले.
गरीब नागरिकांच्या हक्काची घरे श्रीमंतांना विकल्याप्रकरणी मनसेने आज हिरानंदानी समुहावर संताप व्यक्त केला. पक्षातर्फे पवईतील हिरानंदानी परिसरातील ओलंपिया या मुख्य कार्यालयावर धडक देत जोरदार घोषणबाजी करण्यात आली. यावेळी हिरानंदानी यांना जाब विचारून निवेदन देण्यात आले. मनसेचे नेते शिरीष सावंत, महिला संघटीका रिटा गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले असून यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
मुंबई उपनगरातील गरीब मध्यमवगीर्यांकरिता राज्य शासनाने १९७७ या वर्षी नागरी कमाल जमीन धारणा कायद्यांतर्गत १०० एकर जागेत पवई विकासयोजना राबवण्यासाठी मान्यता दिली होती. यासंदर्भात एमएमआरआडीए आणि निरंजन हिरानंदानी यांच्यामध्ये करार झाला होता. दरम्यान, अत्यल्प उत्पन्न गटाकरिता घरे बांधने बंधनकारक असताना विकासक हिरानंदानीने मोठ्या आकाराच्या इमारती बांधून त्या उच्चभ्रू लोकांना विकल्या, असा आरोप मनसेने केला आहे. याच्याच निषेधार्थ आंदोलन केल्याचे मनसेचे विभागीय अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी सांगितले. या सर्व प्रकरणाबाबत हिरानंदानी कार्यालयाशी संपर्क साधला असता प्रतिक्रिया मिळाली नाही.