टिम लय भारी
मुंबई : पूर्वाश्रमीचे काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीमधील (NCP) जे सहकारी आहेत त्यांच्या मनात आता वेगळी भावना आहे. त्यामुळे आता जे कुणी भाजपचा (BJP) राजीनामा देऊन महाविकास आघाडीत येतील त्यांच्या विरोधात भाजप तगडा उमेदवार देईलच. पण आम्ही तिनही पक्ष मिळून त्यांना निवडून आणू, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना ‘घरवापसी’ची साद घातली होती. अजित पवार यांच्या या वक्तव्यावरुन भाजप नेते निलेश राणे (Nilesh rane) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना टोला लगावला आहे.
अजित पवार म्हणतात जे आमदार भाजपमध्ये गेले त्यांनी परत या, आम्ही त्यांना निवडून आणतो. या माणसाला शपथविधीनंतर स्वतःचे आमदार टिकवता आले नाही तो माणूस आमदारांना परत निवडून आणण्याची भाषा करतो.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 18, 2020
निलेश राणे यांनी ट्विट करत अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. निलेश राणे म्हणाले, अजित पवार म्हणतात जे आमदार भाजपमध्ये गेले त्यांनी परत या, आम्ही त्यांना निवडून आणतो. ज्यांना शपथविधीनंतर स्वत:चे आमदार टिकवता आले नाही. ते आमदार परत निवडून आणण्याची भाषा करत आहेत, असा टोला ट्विटच्या माध्यमातून त्यांनी अजित पवार यांना लगावला आहे.
दरम्यान, जयंत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले होते की, गेल्या काही दिवसांपासून अनेक सदस्य चर्चा करत आहे. हाताच्या दोन्ही बोटांपेक्षा जास्त सदस्य भाजपामध्ये नाराज आहेत, त्यांच्यातील बऱ्याच जणांचा राष्ट्रवादीकडे येण्याचा कल आहे. यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये लवकरच मेगाभरती होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.